Tipu Sultan history : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे दोघं एकसमान असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्याचा निषेध केला जात असून राजकीय वातावरणात याचे जोरदार पडसाद उमटत आहेत. पुण्यात सपकाळच्या विरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. टिपू सुलतानचा हिंदू विरोधी इतिहास सर्वश्रुत असताना त्याची तुलना शिवरायांशी केल्याने संतापाची लाट उसळली आहे.
टिपू सुलतानच्या छळाच्या जखमा आजही ओल्या
टिपू सुलतानने त्याच्या राजवटीत हिंदूंचा प्रचंड छळ केला होता, असे अनेक ऐतिहासिक दाखले दिले जातात. या दहशतीच्या खुणा आज 3 शतकांनंतरही ठळकपणे पाहायला मिळतात. देशातील एका गावात तर आजही दिवाळी साजरी केली जात नाही आणि याचे मुख्य कारण टिपू सुलतान आहे. त्याच्या क्रूर छळाच्या जखमा हे गाव आजही विसरू शकलेले नाही. कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील मेलकोटे या प्राचीन मंदिर शहरात दिवाळीच्या दिवशी आनंदाऐवजी शोक साजरा केला जातो.
( नक्की वाचा : Tipu Sultan Controversy: शिवराय आणि टिपू सुलतान एकसमान? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या तुलनेनं संतापाची लाट )
काय आहे तो रक्तरंजित इतिहास
जिथे संपूर्ण देशात दिवाळीचा सण रोषणाई आणि उत्साहात साजरा होतो, तिथे मेलकोटेमधील मंडयम अयंगर ब्राह्मण समुदाय नरक चतुर्दशीला काळी दिवाळी म्हणून पाळतो.
साधारण 235 वर्षांपूर्वी याच दिवशी टिपू सुलतानच्या सैन्याने शेकडो निष्पाप हिंदूंचा नरसंहार केला होता. आजही या समुदायाचे लोक दिवे लावत नाहीत, तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करतात.
ऐन दिवाळीत 800 लोकांचे हत्याकांड
इतिहासकारांच्या मते, 1783 ते 1795 च्या दरम्यान एका नरक चतुर्दशीच्या दिवशी हे हत्याकांड घडले होते. मेलकोटे येथील अयंगर ब्राह्मण श्रीरंगपट्टणच्या नरसिंह मंदिरात दिवाळी साजरी करत असताना टिपूच्या सैन्याने त्यांना चहुबाजूंनी घेरले. टिपूला असा संशय होता की तिरुमाला अयंगर नावाच्या विद्वानाने त्याच्या विरोधात कट रचला आहे. याचा बदला घेण्यासाठी त्याने महिला, मुले आणि वृद्धांसह सुमारे 700 ते 800 लोकांची कत्तल केली. मृतदेह जवळच्या चिंचेच्या झाडांना लटकवण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात दहशत पसरली होती.
आजही गावात पसरतो सन्नाटा
या भीषण नरसंहारानंतर मेलकोटे गाव पूर्णपणे ओसाड झाले होते. अनेक लोक जीव वाचवण्यासाठी गाव सोडून पळून गेले आणि हे सुंदर मंदिर शहर एका रात्रीत भूतिया शहर बनले. येथील 29 पवित्र तलाव सुकले आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले. कालांतराने लोक पुन्हा वसले, पण त्यांनी टिपू सुलतानने दिलेली ती जखम कधीच भरून काढली नाही. आजही या गावात नरक चतुर्दशीला घराघरात शोक पाळला जातो. टिपूच्या या क्रूर इतिहासाचा संदर्भ देऊनच आता सपकाळच्या वक्तव्याचा विरोध केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world