- कोलकाता विमानतळ परिसरातील 136 वर्ष जुन्या बांकडा मशिद स्थलांतरित करण्यात येणार आहे
- विमानतळाच्या धावपट्टीपासून मशिदेचे अंतर 165 मीटर असून, आंतरराष्ट्रीय नियमांनुसार 244 मीटर अंतर असणे आवश्यक आहे
- धावपट्टीचा 88 मीटर भाग मशिदेच्या जवळ असल्याने वापरता येत नाही आणि इमरजन्सी लँडिंगमध्ये अडचण निर्माण होते
Mosque Relocation: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (Kolkata Airport) परिसरात एक मशिद आहे. ही ऐतिहासिक मशिद आहे. 'बांकडा मशिद' (गौरीपूर जामा मशिद) असं तिचं नाव आहे. ही मशिद दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे. विमानतळाची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलले आहे. विमानतळ परिसरातील जुन्या टर्मिनलचे बांधकाम पाडून त्याठिकाणी आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. यामुळे कोलकाता विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 4 कोटीपर्यंत वाढवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
ही मशिद ऐतिहासिक समजली जाते. तिचा इतिहास जवळपास 136 वर्षे जुना आहे. विमानतळाच्या स्थापनेपूर्वीच तिचे निर्माण झाले होते. मात्र, सध्या ही मशिद विमानतळाच्या अति-सुरक्षित 'एयरसाइड झोन'मध्ये आहे. त्यामुळे अनेक समस्या येत आहेत. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण नियमांनुसार (ICAO), धावपट्टीपासून किमान 244 मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम असू नये. तसे असल्याच ते धोकादायक ठरू शकते. ही मशिद विमानतळाच्या दुय्यम (सेकंडरी) धावपट्टीपासून अवघ्या 165 मीटर अंतरावरच आहे. यामुळे धावपट्टीचा जवळपास 88 मिटर भाग वापरता येत नाही. शिवाय या मुळे इमरजन्सी लँडिंगसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाने सुरक्षेचा धोका लक्षात घेतला आहे. त्यामुळेच आता ही मशिद विमानतळाबाहेर सुरक्षित स्थलांतरीत केली जाणार आहे. ही मशिद सरकारी जमिनीवर उभारली जाईल. याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी लागणारी पर्यायी जमीन आणि बांधकामाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे. त्यामुळे आता ही मशिद इतिहास जमा होणार आहे. मशिद हटवण्याबाबत मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची ही काळजी घेतली जात आहे. म्हणून भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि प्रशासनाने काळजी विचारपूर्वक पावलं टाकली आहेत.
1890 मध्ये ब्रिटिश काळात ही मशिद बांधण्यात आली होती. या मशिदीच्या परिसरात 1924 मध्ये दमदम विमानतळाचा विकास सुरू झाला. स्वातंत्र्यानंतर विमानतळाचा विस्तार करताना ही जमीन विमानतळ प्राधिकरणाकडे सोपवण्यात आली होती. 2003 मध्ये तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री शाहनवाज हुसेन आणि पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यात चर्चा झाली होती. त्यानुसार मशिद न पाडता धावपट्टीची दिशा किंचित बदलण्यात आली होती. राजकीय संवेदनशीलता आणि स्थानिक विरोधाच्या भीतीने डाव्या आणि तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारने हा मुद्दा प्रलंबित ठेवला होता. सध्या ही मशिद सीआयएसएफच्या (CISF) कडक बंदोबस्तात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world