मोदी सरकारमधील एका मंत्र्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपतींनी तो तत्काळ प्रभावाने मंजूर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार हा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची माहिती राष्ट्रपती भवनातून देण्यात आली. रवनीत सिंह बिट्टू यांना पंजाब विधानसभेच्या आगामी निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहेत. त्यामुळेच त्यांनी हा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.
रवनीत सिंह बिट्टू हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू आहेत. राज्यातील एका प्रभावी राजकीय घराण्यातून ते येतात. भाजपसाठी पंजाबमध्ये ते एक प्रमुख शीख चेहरा म्हणून त्यांना ओळखले जाते. बिट्टू हे राज्यसभा खासदार होते. भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी दिली होती. त्यानंतर मोदी सरकारमध्ये त्यांना मंत्री ही करण्यात आलं होते. मात्र, त्यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ जून महिन्यात संपला. त्यांना पुन्हा राज्यसभेसाठी संधी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी आता आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी जरी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्यावर पंजाबमध्ये पक्षाची महत्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. ते पंजाबमध्ये भाजपसाठी सक्रीय झाले आहेत. पुढील वर्षा पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. यामध्ये पंजाबचा ही समावेश आहे. सध्या पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे. मुख्य विरोधी पक्ष हा काँग्रेस आहे. असं असलं तरी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशा परिस्थितीत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.
आतापर्यंत भाजपची ओळख शहरी हिंदूंची पार्टी म्हणून होती. परंतु आता पक्ष सर्वसमावेशक राजकीय विस्तारासाठी शीख नेत्यांना प्राधान्य देत आहे. सुनील जाखड, कॅप्टन अमरिंदर सिंह आणि रवनीत सिंह बिट्टू यांच्या माध्यमातून भाजप पंजाबमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात त्यांना किती यश येते हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. शिवाय आपचे काही राज्यसभेचे खासदार हे भाजपमध्ये आले आहेत. ते पंजाबमधूनच राज्यसभेवर गेले होते. त्यामुळे त्यांची शक्ती ही भाजपच्या मागे असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world