- शिवपुरीतील वन कर्मचाऱ्याचा अपघातानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेण्यात आला होता
- वन विभागाने मृतदेहावर अग्नी लावण्याआधी शवविच्छेदनासाठी तो ताब्यात घेतला कारण सरकारी नियम आहेत
- बनवारीलाल रजक यांचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोस्टमार्टम न करता अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती
Dead Body Lifted from Pyre: शिवपुरी येथील एका स्मशानभूमीत मंगळवारी सकाळी अनपेक्षित प्रकार घडला. एका वन कर्मचाऱ्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत नेले. तिथे चिताही रचण्यात आली होती. त्यावर मृतदेह ठेवण्यात आला. अग्नी दिला जाणार होता. त्याच वेळी तिथे वन विभागाचे अधिकारी पोहोचले. त्यांनी चितेवर ठेवलेला पार्थिव देह पुन्हा ताब्यात घेतला. हे कृतीने सर्वच जण हबकले. पण त्यामागचे कारण समजल्यानंतर सर्वांनीच वन विभागाचे आभार मानले.
सरकारी लाभ मिळवून देण्यासाठी शवविच्छेदन (Postmortem) अनिवार्य असल्याने विभागाने हे पाऊल उचलले होते. वन कर्मचारी बनवारीलाल रजक सोमवारी दुपारी एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले होते. ग्वाल्हेरला उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा मृतदेह घरी आणल्यानंतर, कुटुंबीयांनी मंगळवारी सकाळी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र, पोलिसांना किंवा विभागाला माहिती न देता ही प्रक्रिया सुरू असल्याचे कळताच वन विभागाची टीम रुग्णवाहिकेसह तिथे पोहोचली.
वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बनवारीलाल हे सरकारी कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात कुटुंबाला पेन्शन, विमा आणि सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी शवविच्छेदन अहवाल असणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. "जर शवविच्छेदनाशिवाय अंत्यसंस्कार झाले असते, तर कुटुंबाला भविष्यात मोठी आर्थिक अडचण आली असती," असे विभागाने स्पष्ट केले. यानंतर मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन करून मृतदेह पुन्हा सन्मानाने कुटुंबाकडे सोपवण्यात आला.
बनवारीलाल रजक यांचा अपघाती मृत्यू झाला होता. कुटुंबाने पोस्टमार्टम न करताच त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली होती. मात्र, सरकारी नियमानुसार पोस्टमार्टमशिवाय विमा किंवा मदतीची रक्कम मिळत नाही. आपल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर भविष्यात उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी वन विभागाने ही कठोर पण आवश्यक पावले उचलली. स्मशानभूमीत काही काळ तणाव होता, पण अधिकाऱ्यांनी जेव्हा कुटुंबाला समजावून सांगितले की, "हे तुमच्या हिताचे आहे", तेव्हा सर्वांनी सहकार्य केले. एका मृत कर्मचाऱ्याच्या हक्कासाठी स्मशानभूमीपर्यंत धाव घेणाऱ्या या वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे.