Salman Khan be arrested : पान मसाल्याच्या कथित दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खान कायदेशीर अडचणीत सापडल्याचं चित्र आहे. जयपूर जिल्हा ग्राहक आयोग क्रमांक २ ने त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या जामीनपात्र वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी विशेष पोलीस कृती दल स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयोगाने निर्देश दिले आहेत की, ही टीम मुंबईला जाऊन सलमान खानला वारंट बजवावं. आयोगाने या प्रकरणात कडक भूमिका घेतली आहे. जर वॉरंट बजावण्यात अडचणी येत असतील किंवा ६ एप्रिल रोजी सलमान खानसह पान मसाला कंपनीचे संचालक राकेश चौरसिया आणि दिनेश कुमार चौरसिया आयोगासमोर हजर झाले नाही तर त्यांच्याविरोधात अटकेचं वारंट जारी करण्यात येईल.
सेलिब्रिटी कायद्याहून मोठ्या नाहीत...
आयोगाचे अध्यक्ष जीएल मीणा आणि सदस्य सुप्रिया अग्रवाल, अजय कुमार यांच्या खंडपीठाने पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून जयपूर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांना हा आदेश दिला आहे. तक्रारदार योगेंद्र सिंग यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हा आदेश पारित करण्यात आला आहे. आयोगाने आपल्या आदेशात कडक शब्दात म्हटलं, सेलिब्रिटी स्टेटस असलेली कोणतीही व्यक्ती कायद्याहून मोठी नसते. वारंटची अंमलबजावणी न होणं ही कायद्याची थट्टा आहे आणि त्यामुळे आयोगांवरील ग्राहकांचा विश्वासही कमकुवत होतो.
केशर असल्याच्या दाव्यावरुन खटला
या प्रकरणाची सुरुवात योगेंद्र सिंह यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन झाली. ज्यामध्ये राजश्री पान मसालाच्या जाहिरातीवर निर्बंध लावण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदारने म्हटलं की, उत्पादनाला केशरयुक्त (Saffron) म्हणण्यात आलं आहे. मात्र त्याची किंमत पाहता त्यात केशर असणं शक्य आहे. ज्यातून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे.