- वजन वाढणे हे फक्त भातामुळे होणार नाही, तर आहारातील प्रमाण आणि जीवनशैलीवर अवलंबून असते
- गरजेपेक्षा जास्त भात खाल्ल्यास आणि शारीरिक हालचाल कमी असल्यास वजन वाढण्याची शक्यता वाढते
- ब्राऊन राइस फायबरमध्ये समृद्ध असल्याने पचनासाठी चांगला असून पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत आरोग्यदायी मानला जातो
वजन कमी करण्याचा विचार मनात आला की, अनेकजण सर्वात आधी ताटातला भात कमी करतात. भात खाल्ल्याने पोट सुटते किंवा लठ्ठपणा वाढतो, असा एक मोठा समज समाजामध्ये आहे. मात्र, केवळ भाताला वजन वाढण्यासाठी जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वजन वाढणे हे तुम्ही किती प्रमाणात भात खाता आणि तुमची जीवनशैली कशी आहे, यावर अवलंबून असते. वजन वाढण्यासाठी केवळ भात कारणीभूत नसून तुमची चुकीची खाण्याची पद्धत कारणीभूत असू शकते. तज्ज्ञांच्या मते, भात हा ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. जर तुम्ही दिवसभर शारीरिक श्रम करत असाल, तर भात तुमच्यासाठी अजिबात हानिकारक नाही.
समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा गरजेपेक्षा जास्त भात खाल्ला जातो. शारीरिक हालचाल कमी असते. त्यामुळे भात पूर्णपणे बंद करण्यापेक्षा त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे हाच उत्तम पर्याय आहे. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राइस अधिक आरोग्यदायी मानला जातो. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने तो पचायला वेळ लागतो, ज्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही. याउलट, पांढरा तांदूळ हा प्रोसेस्ड असल्याने त्यातील फायबर कमी असते. मात्र, तज्ज्ञांच्या मते, जर पांढरा भात योग्य प्रमाणात खाल्ला तर तो शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतो.
केवळ भात सोडल्याने वजन कमी होत नाही. जर तुम्ही भातासोबत भरपूर तूप, तळलेले पदार्थ किंवा गोड पेये घेत असाल, तर वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. भात खाताना तो डाळ, पालेभाज्या, कोशिंबीर आणि प्रथिनांसोबत (Protein) खाणे अधिक फायदेशीर ठरते. यामुळे आहार संतुलित होतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाणही अचानक वाढत नाही. वजन कमी करण्याच्या प्रवासात 'कार्बोहायड्रेट्स'कडे शत्रू म्हणून पाहिले जाते, ज्यात भात अग्रस्थानी असतो. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, वजन वाढणे हे 'कॅलरी इनटेक' आणि 'कॅलरी बर्न' यांच्या संतुलनावर अवलंबून असते.
पांढऱ्या तांदळात फायबर कमी असले तरी, ते डाळ किंवा भाजीसोबत खाल्ल्यास त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. त्यामुळे भात खाणे पूर्णपणे वर्ज्य करण्याऐवजी तो संतुलित पद्धतीने खाण्याचा सल्ला संशोधक देतात. केवळ आहार बदलून उपयोग नाही, तर नियमित व्यायाम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकांना भाताशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही, पण वजन वाढण्याच्या भीतीने ते भात टाळतात. मात्र, आहारतज्ज्ञांनी हा समज दूर केला आहे. भात खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ पाळली तर लठ्ठपणा वाढत नाही. जेवणात प्रथिनांचा समावेश करा आणि जेवणानंतर किमान 15 ते 20 मिनिटे चाला असा सल्ला देतात.