
सुनील दवांगे, प्रतिनिधी
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात तणावाचं वातावरण आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाई करण्याचे सर्व अधिकार केंद्र सरकारनं सैन्याला दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राहुरी तालुक्यातल्या वरवंडीमध्ये फायटर जेट विमानातून पडलेला तब्बल 450 किलो वजनाचा जिवंत बॉम्ब सापडला आहे. बुधवारी दुपारी सात फूट खड्ड्यातून हा बॉम्ब काढण्यात आला. पुण्यातल्या भारतीय सैन्य दलाच्या बीडीएस पथकाने बॉम्बचा फ्युज काढून तो निष्क्रिय केला आहे. त्यानंतर हा बॉम्ब अहिल्यानगरमधील सैन्याच्या केके रेंजमध्ये नेऊन त्याचा स्फोट करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?
24 मार्च रोजी दुपारी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बांबू प्रक्षेत्रावर फायटर विमानातून बॉम्ब निसटला. त्यानंतर तो बॉम्ब धोमीरीमधील शेतकऱ्याच्या जमिनीत सहा फुट खोल रुतला होता. पाण्याचे सायपन फुटून खराब झालेल्या जलवाहिन्या दुरुस्त करताना बॉम्बचे टोक आढळले.
( नक्की वाचा : Caste census : जातीनिहाय जनगणना म्हणजे काय? ती घेण्याची वेळ का आली? वाचा सर्व प्रश्नांची उत्तर )
हा बॉम्ब आढळताच तातडीनं याची माहिती सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली. वायूसेना आणि थलसेनेच्या पथकानं बॉम्ब जिवंत असल्याचा निष्कर्ष काढला. त्याचबरोबर त्या परिसरात कुणीही फिरु नये अशी सूचना त्यांनी दिली. त्यानंतर आता एक आठवड्यानं हा बॉम्ब बाहेर काढण्यात आला आहे. पुण्यातील लष्कराच्या बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकानं घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने सात फूट खड्ड्यातील जिवंत बॉम्ब बाहेर काढला. त्यानंतर तो बॉम्ब घटनास्थळावरुन दूर नेण्यात आला आहे.
हा बॉम्ब वाहनातून आहिल्यानगर-मनमाड रस्त्याने नेताना सुरक्षेच्या कारणामुळे दोन्ही बाजूची वाहतूक अर्धा तास बंद ठेवण्यात आली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world