Ajit Pawar Death News: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांचे काका अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवार यांच्या अपघाताला 20 दिवस पूर्ण झाले आहेत, पण नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) अद्याप प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्यात आलेला नाही. या दिरंगाईमुळे रोहित पवार यांनी संशय व्यक्त करत प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.
शंका अधिक बळावत चालल्या आहेत: रोहित पवार
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की,"स्व.दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही, तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही, परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे DGCA ने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसेच VSR वर योग्य ती कारवाई करावी!"
DGCA ने वेळ का दिला नाही? रोहित पवारांचा संतप्त सवाल
14 फेब्रुवारी रोजीही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं होतं की" अजितदादांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका निर्माण झाल्या असून तथ्यांसह या शंका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेपुढे मांडल्या. याच विषयावर गृहमंत्री अमित शाह साहेब, नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू जी तसेच DGCA ची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भेट होऊ शकली नाही. त्यामुळं प्रेझेंटेशनसह आमच्या सर्व शंका गृहमंत्री, नागरी उड्डाणमंत्री आणि DGCA यांना ई-मेल पाठवून या अपघाताबाबत सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची विनंती केली. याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या अनेक प्रश्नांची वस्तुनिष्ठ उकल होईल, असा विश्वास आहे.
(नक्की वाचा: Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमानात स्फोटके होती का? अमोल मिटकरींचा सवाल)
पत्रकार परिषद घेतल्यानंतर तपासाला काही प्रमाणात वेग आला असला तरी अद्यापही अपेक्षित वेगाने तपास मात्र होताना दिसत नाही. माननीय गृहमंत्री, नागरी उड्डाणमंत्री अधिवेशनामध्ये व्यस्त असल्यामुळे वेळ देता आला नसेल परंतु DGCA ने वेळ का दिला नाही, हे मात्र समजले नाही. यंत्रणांनी वेळ दिला नसला तरी सर्व माहिती यंत्रणाकडे पाठवली आहे, सत्तेत नसलो तरी आम्ही आमच्या पद्धतीने पाठपुरावा करतच आहोत, राज्य सरकार आणि सत्तेतील सर्वचजण देखील यासाठी पाठपुरावा करतील, ही अपेक्षा..!"
निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लीस्ट केलं जातं.. चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय VSR कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळंही लावायला पाहिजे होतं. पण तसं होताना का दिसत नाही, हे न समजणार कोडं आहे.. की कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का, ज्यामुळं सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतं?
(नक्की वाचा: Abdul Sattar: अब्दुल सत्तारांच्या दर्शनाने नागेश्वर मंदिर अपवित्र? तरुणांनी गोमूत्र शिंपडून केले शुद्धीकरण)
देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी, सर्वपक्षीय राजकीय नेते या VSR कंपनीची सेवा घेत असतील तर त्यांचा आणि पायलटसह अन्य कर्मचाऱ्यांचाही जीव तेवढाच महत्त्वाचा नाही का? त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, तातडीने या कंपनीवर कारवाई करून तिच्या देशातील सेवेला बंदी घालावी.