- सागर कुलकर्णी, प्रतिनिधी
Ajit Pawar Death News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (राशप) आमदार रोहित पवार यांनी अजित पवार विमान अपघात प्रकरणी नवी माहिती मांडण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नव्याने धक्कादायक गोष्टी समोर आणल्या आहेत. "दादा आणि आमच्यामध्ये विलीनीकरणाबाबत नेमकी काय चर्चा झाली, हे फक्त आम्हालाच माहिती आहे," असे सांगत रोहित पवार यांना अपघात प्रकरणामागे घातपाता असल्याचा खळबळजनक संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
रोहित पवारांनी मांडले दोन महत्त्वाचे दृष्टिकोन आणि संशयाची सुई
पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी दोन महत्त्वाचे पैलू मांडले आहेत. रोहित पवार म्हणाले की, "दादा आणि आमच्यामध्ये विलीनीकरणाची जी काही चर्चा सुरू होती, हे आम्हालाच माहिती आहे. यामध्ये एक चर्चा अशीही असू शकते की आम्ही (राशप) एनडीएसोबत सत्तेत जाणार. ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी. दुसरा जो दृष्टिकोन आहे की दादाच एनडीएमध्ये राहणार नाही. दादाच एनडीएमधून बाहेर पडतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची लढाई आमच्यासोबत लढतील, हा दृष्टीकोन एका गटाला आवडला नसावा. त्यामुळे यामध्ये जर राजकारण असेल आणि याला जर आपल्याला घातपात म्हणावा लागत असेल तर या दोन दृष्टीकोनापैकी एक कोणतातरी दृष्टीकोन असावा आणि त्या दृष्टीकोनाला पाठिंबा देणारा एक जो गट आहे तो यामागे असू शकतो". रोहित पवार यांनी थेट आरोप केल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय.
आता अजित पवार यांना नेमके कोणत्या गटाचा विरोध होता? असा प्रश्न रोहित पवारांच्या शंकेमुळे निर्माण झालाय.
तो नेता कोण? ज्यावर रोहित पवारांनी केला गंभीर आरोप
रोहित पवार यांनी एका नेत्याचं नाव न घेता आणखी एक धक्कादायक माहिती सांगितली की, "आजच्या राजकारणात निवडणूक लढत असताना मार्गदर्शक प्रमाणपत्र आणि कागदांची आवश्यकता असते. मोठी निवडणूक असेल तर मार्गदर्शक कागद जास्त लागतात, छोटी निवडणूक असेल तर कमी लागतात. पण दादांचा हा अपघात होण्यापूर्वी सर्व नियोजन दादा करायचे पण मार्गदर्शक कागदांचं डिस्ट्रिब्युशन हे दुसरा कुठला तरी नेता करायचा. 28 जानेवारी रोजी या मार्गदर्शक कागदांचे नियोजन झालं होतं. 200 पट ताकद या मार्गदर्शक कागदांच्या माध्यमातून येथे लावली जाणार, असा निर्णय झाला होता. दुर्दैवानं 28 जानेवारीची घटना घडली. या मार्गदर्शक कागदांच्या माध्यमातून 200 पट ताकद लावली जाणार होती, पण दादा नसताना फक्त 50 पटच ताकद लावली, त्यामुळे उमेदवार (राष्ट्रवादी अजित पवार) दादा नसताना कमकुवत पडले-एकटे पडले,अशी चर्चा आहे. दीडशेपट ताकद कोणी कमी लावली आणि का कमी लावली? हे देखील पाहावं लागेल".
ब्लॅक ब्लॉकवरूनही साधला निशाणा
दरम्यान विमान अपघातामागे आता यापैकी नेमक्या कोणत्या गटाचा हात असावा, अशी चर्चा सुरू झालीय. विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबत सुरू असलेल्या वादावरही त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ब्लॅक बॉक्स उन्हापासून, वाऱ्यापासून, पावसापासून, आगीपासून, बॉम्ब ब्लास्टपासून सुरक्षित आहे मात्र राजकारणापासून सुरक्षित नाही; असं विधान रोहित पवार यांनी केले होते.
रोहित पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद ऐका VIDEO