Ajit Pawar Plane Crash: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता 10 दिवसांचा कालावधी उलटला आहे. या अपघाताभोवती असलेला संशयाचा धूर अद्याप शमलेला नाही. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सातत्याने नवनवे दावे केले जात आहेत. आता शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केलेल्या एका खळबळजनक विधानाने या वादात मोठी भर पडली आहे. अजित पवारांच्या विमानात नेमका बॉम्ब होता का, असा थेट सवाल सोनावणे यांनी उपस्थित केला असून या अपघाताच्या संपूर्ण चौकशीची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
काय आहेत 7 गंभीर प्रश्न?
खासदार बजरंग सोनावणे यांनी या अपघातासंदर्भात अत्यंत गंभीर प्रश्न विचारले आहेत. त्यांनी विचारले की, विमान जमिनीला लागण्याआधीच हवेत कसे क्रॅश झाले? जमिनीला स्पर्श होण्यापूर्वीच विमानात पहिला स्फोट कसा झाला आणि त्यानंतर जमिनीवर आदळल्यावर दुसरा स्फोट कसा झाला? इंजिनाच्या जवळ असलेले लोक अपघाताच्या वेळी विमानाबाहेर आधी कसे फेकले गेले? या सर्व घडामोडी पाहता हा केवळ अपघात आहे की घातपात, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. विमानात आधीच बॉम्ब ठेवला होता का किंवा इंजिनाचा मुद्दाम स्फोट घडवून आणला का, असे प्रश्न विचारून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.
( नक्की वाचा : Ajit Pawar Death :अजित दादांची चप्पल चोरून घरात केली होती पूजा; अमोल मिटकरींनी सांगितली काळजाला भिडणारी आठवण )
घटनेच्या दिवशीचा घटनाक्रम जाहीर करण्याची मागणी
सोनावणे यांनी केवळ प्रश्नच विचारले नाहीत, तर त्यांनी सरकारकडे एका विशेष मागणीचा आग्रह धरला आहे. २८ जानेवारी रोजी ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली, त्या दिवशी सकाळी उठल्यापासून अजित पवारांनी नेमके काय केले, त्यांचा संपूर्ण घटनाक्रम सरकारने जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या एका मिनिटाच्या वक्तव्यामुळे आता तपास यंत्रणांसमोर नवीन पेच निर्माण झाला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
इतर नेत्यांनी उपस्थित केलेले संशय आणि प्रश्न
अजित पवारांच्या अपघातावरून संशय व्यक्त करणारे सोनावणे हे पहिलेच नेते नाहीत. यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अपघात घडल्यानंतर काही तासांतच घातपाताची शक्यता वर्तवली होती. तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हा अपघात 'ऑपरेशन लोटस'चा भाग तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल मिटकरींनी मृतदेहांच्या संख्येवरून प्रश्न उपस्थित केला होता. विमानात 6 जण प्रवासात असताना केवळ 5 जणांचेच मृतदेह कसे सापडले, हा मुद्दा त्यांनी लावून धरला आहे.
( नक्की वाचा : Ajit Pawar: विमानाची ती सुरक्षा यंत्रणा आणि 28 दिवसांची डेडलाईन; अजित पवारांच्या अपघाताबाबत सर्वात मोठा खुलासा )
हवामान आणि वैमानिकांच्या उपस्थितीवर संभ्रम
सुषमा अंधारे यांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत प्रशासनाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. प्रशासनाने तिथे धुके असल्याचे सांगितले होते, मात्र फुटेजमध्ये तसे दिसत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. दुसरीकडे, रूपाली ठोंबरे यांनी वैमानिकांच्या बाबतीत संशय व्यक्त केला होता. हे विमान कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश उडवणार होते, पण ते दोघेही एकाच वेळी ट्रॅफिकमध्ये कसे अडकले आणि त्यांना उशीर का झाला, हे न उलगडणारे कोडे असल्याचे त्यांनी म्हटले होते.
छगन भुजबळ यांनीही विमान हवेत घिरटी घालून अचानक पलटी होणे ही बाब संशयास्पद असल्याचे सांगत काहीतरी गडबड असल्याची भीती व्यक्त केली होती.
प्रशासकीय चौकशीचा फेरा आणि एसआयटीचा तपास
या सर्व वाढत्या संशयाच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागांतर्गत येणाऱ्या विमान संचालनालयातील अधिकाऱ्यांची आता एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार आहे. व्हीएसआर कंपनीचे विमान भाड्याने घेण्याची सूचना कोणत्या अधिकाऱ्याने दिली होती आणि त्या विमानाची तांत्रिक स्थिती तपासली होती का, याची सखोल चौकशी सुरू आहे. या तपासाची व्याप्ती वाढवून आता अजित पवारांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीही चौकशी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world