
योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला
Akola News : अकोल्याच्या पातुर तालुक्यातील आलेगाव येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी थेट रस्त्यावरच पाण्यात बसून आंदोलन केले. प्रशासनाने अनेकदा तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे संतापलेल्या एका ग्रामस्थाने 'प्रशासन ऐकत नाही, म्हणून फाशी घेईन' असा थेट इशारा दिला, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली.
काय आहे प्रकरण?
आलेगावमधील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे, संतप्त नागरिकांनी 'जोपर्यंत पाणी काढले जात नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही,' असा पवित्रा घेतला. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पातुरचे तहसीलदार डॉ. राहुल वानखेडे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना माहिती दिली.
( नक्की वाचा : Akola News: '700 व्यापाऱ्यांचा रोजगार धोक्यात'; राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात अकोल्यात मोठा संघर्ष पेटणार? )
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तात्काळ आश्वासन
या तक्रारीची गंभीर दखल घेत नवनियुक्त जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दुसऱ्याच दिवशी गुरुवारी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत, "कायदा हातात घेऊ नका, प्रशासन या समस्येवर काम करत आहे. लवकरच विकासकामांचा सविस्तर आराखडा तयार केला जाईल," असे आश्वासन दिले.

'अन्यथा मी थेट फाशी घेईन'
यावेळी एका ग्रामस्थाने प्रशासनाला उपाय सुचवत, 'रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पीडब्ल्यूडीची (PWD) मर्यादा निश्चित करून नाली काढा, अन्यथा मी थेट फाशी घेईन,' असा इशारा दिलाय त्यामुळे खळबमळ उडाली. पण, त्याचवेळी या ग्रामस्थाचं वक्तव्य हे प्रश्नाची तीव्रता आणि त्याचा संताप व्यक्त करणारे आहे. ही टोकाची भूमिका योग्य नाही, असं इतर ग्रामस्थांनी सांगितला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे संतप्त नागरिकांचा रोष शांत झाला आणि प्रशासनाने तात्काळ कारवाईचे आदेश दिले. सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मर्यादा निश्चित करणे आणि पाणी वाहून नेण्यासाठी नाल्या बांधकामाची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनची ही समस्या मार्गी लागणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world