शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amravati News : भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पत्नी तेजस्विनी आणि मुलगा ज्योतिरादित्य यांच्यासह मध्यप्रदेशातील बागेश्वर धामला सहकुटुंब भेट दिल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच महाराष्ट्रातील राजकीय आणि पुरोगामी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गवई यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा आशीर्वाद घेत "सनातन संस्कृती बळकट करण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे आहेत" असे मत व्यक्त केले. या भेटीमुळे आंबेडकरी चळवळीत आणि दलित समाजात तीव्र संताप उसळला आहे.
माजी सरन्यायाधीशांवर टीका...
अमरावती येथील काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत या विषयावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि यशोमती ठाकूर यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही नेत्यांनी थेट भूमिका घेणे सोयीस्करपणे टाळले. वडेट्टीवार म्हणाले, "भूषण गवई बागेश्वर धामला का गेले हे त्यांनाच विचारा. चंद्रपूरच्या माणसाने बोलण्यापेक्षा ते अमरावतीचेच आहेत." यशोमती ठाकूर यांनीही तेवढ्याच चलाखीने सांगितले, "अमरावतीवाल्यांनी काय सांगायचं तो त्यांचा विषय आहे." थोडक्यात दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे चेंडू ढकलत स्वतःची सुटका करून घेतली. पुरोगामी कार्यकर्त्यांनी मात्र स्पष्ट संताप व्यक्त करताना सांगितलं की, ज्या बाबासाहेबांच्या नावावर गवईंनी पदे उपभोगली, त्याच विचारांना तिलांजली देऊन ते एका बाबाच्या चरणी जात आहेत. बागेश्वर शास्त्रींच्या चमत्कारांचा अनेकदा पर्दाफाश झाला असतानाही सर्वोच्च घटनात्मक पदावर राहिलेल्या व्यक्तीने तिथे जाणे हा संविधानाचा आणि आंबेडकरी चळवळीचा अपमान असल्याचे टीका होत आहे.
गवई हे अमरावतीचे सुपुत्र असून त्यांचे वडील रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते होते. त्यामुळेच या भेटीमुळे दलित समाजात विशेष अस्वस्थता निर्माण झाली आहे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली काँग्रेस नेत्यांनी भूमिका टाळणे म्हणजे दलित मतपेढीला गृहीत धरण्याचाच प्रकार असल्याची टीका आता सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.