शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amravati News: होळी आणि रंगपंचमी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते हवेत उडणारे रंग, पाण्याचे फुगे आणि घराघरात होणारा पुरणपोळीचा बेत. मात्र अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद या गावाने गेल्या 75 वर्षांपासून एक वेगळाच आदर्श जपला आहे.
या गावात ना होळी पेटवली जाते, ना रंगांची उधळण होते. साध्या सोप्या शब्दात सांगायचे तर, येथे रंगांच्या उत्सवापेक्षा हरिनामाच्या गजरला अधिक महत्त्व दिले जाते. ही परंपरा केवळ एका गावापुरती मर्यादित नसून ती मानवतेचा आणि निसर्गसंवर्धनाचा मोठा संदेश देणारी ठरली आहे.
काय आहे परंपरा?
पिशंळोद हे गाव विदर्भात परमहंस श्री संत परशराम महाराज समाधी संस्थानमुळे प्रसिद्ध आहे. महाराजांचा जन्म 14 मे 1900 रोजी भातकुली तालुक्यातील जैतापूर येथे झाला होता. त्यांनी सर्वांना अध्यात्म, बंधुभाव आणि एकात्मतेची शिकवण दिली. खारपाण पट्ट्यात असलेल्या या भागात त्यांनी गोड पाण्याचा झिरा शोधून काढल्याची कथा आजही श्रद्धेने सांगितली जाते. याच ठिकाणी आता संत परशराम महाराज जलकुंड विकसित होत असून भाविकांसाठी ते एक श्रद्धेचे केंद्र बनले आहे.
( नक्की वाचा : Amravati : 'आमचे सर आम्हाला परत द्या!'; एका निर्णयाने विद्यार्थ्यांनी सोडला घास, अमरावतीत हायव्होल्टेज ड्रामा )
या अनोख्या परंपरेमागे एक भावूक इतिहास आहे. 22 मार्च 1951 रोजी संत परशराम महाराज यांचे देवासन झाले. योगायोगाने त्यावेळी होळी पौर्णिमेचा दिवस होता. आपल्या लाडक्या संतांच्या निधनामुळे संपूर्ण गाव शोकाकुल झाले आणि गावकऱ्यांनी त्या दिवसापासून होळी न पेटवण्याचा आणि रंग न खेळण्याचा निर्णय घेतला.
रंगपंचमीच्या दिवशी महाराजांना समाधी देण्यात आली, त्यामुळे या काळात आनंदाऐवजी भक्तीमध्ये लीन राहण्याची प्रथा सुरू झाली. गेल्या 75 वर्षांपासून पिंपळोदमध्ये रंगांच्या उधळणीऐवजी हरिनाम, गाथा पारायण, भागवत, कीर्तन आणि होमहवन केले जाते.
( नक्की वाचा : Chandra Grahan 2026: वर्षातील पहिले चंद्र ग्रहण, सुतक काळापासून ते राशीभविष्यापर्यंत; वाचा 10 प्रमुख मुद्दे )
पर्यावरणपूरक उत्सवाचा मोठा संदेश
आजच्या काळात सरकार आणि स्वयंसेवी संस्था रासायनिक रंगांपासून होणारे त्वचारोग, पाण्याची नासाडी आणि वृक्षतोड रोखण्यासाठी जनजागृती करत आहेत. मात्र पिंपळोदच्या गावकऱ्यांनी हा पर्यावरणस्नेही मार्ग सात दशकांपूर्वीच स्वीकारला आहे.
विशेष म्हणजे गावातील दुकानदार होळीच्या काळात रंग किंवा पिचकारी विक्रीसाठी ठेवत नाहीत, कारण कोणीही ते खरेदी करत नाही. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या मनात एकच विचार असतो की, रंग हा माणसांना जोडण्याचा आणि देव शोधण्याचा असावा.
होळीच्या काळात या ठिकाणी भव्य दिंडी-पालखी सोहळा आणि गावपरिक्रमा आयोजित केली जाते. परशराम नगर आयटीआय परिसरातून निघणाऱ्या या सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होतात. तसेच डिसेंबर महिन्यात श्री दत्त जयंतीनिमित्त येथे आठवडाभर मोठी यात्रा भरते. एका भाविकाने अर्पण केलेली 201 किलोची घंटा हे येथील मुख्य आकर्षण आहे. समाधी जवळ श्री दत्त आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती विराजमान असून, त्यातून सर्वधर्मसमभावाचा संदेश संपूर्ण जगाला दिला जातो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world