देवा राखुंडे
आषाढी वारी निमित्त अनेक पालख्या, दिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे. त्यात संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या ही आळंदी आणि देहूवरून पंढरपूच्या दिशेने चालल्या आहेत. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज यवत मुक्कामी आहे. पालखी सोहळा यवतमधील श्री काळभैरवनाथ मंदिर येथे विसाव्यासाठी येणार आहे. या गावाने एक अनोखी परंपरा आजही जपली आहे. या गावातील गावकरी या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची मनोभावे सेवा करतात. अनेक वर्षापासून हे सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तुकाराम महाराजांची पालखी यवत गावात आल्यानंतर गावकरी वारकऱ्यांची सर्व काळजी घेतात. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप केले जाते. याला अनेक वर्षाची परंपरा आहे. यंदा देखील ही परंपरा कायम ठेवत यवतकरांनी वारकऱ्यांसाठी तब्बल एक टन हून अधिकच पिठलं तयार केलं जाणार आहे. तर एक लाखाच्या घरात भाकरींचा बेत आखला आहे. त्याची संपूर्ण तयारी झाली असल्याचं ह.भ.प. नाना महाराज दोरगे आणि गावकरी चंद्रकांत दोरगे यांनी सांगितलं आहे.
या महाप्रसादाची एक विशिष्ट पद्धत आहे. विशेष म्हणजे गावातील प्रत्येक रहिवासी आपल्या परीने पाच–दहा भाकरी या महाप्रसादासाठी देतात. तर काही गावकरी हे 100 भाकऱ्या ही देतात. हे सर्व पालखी ज्या ठिकणी विसाव्याला थांबते त्या मंदिरात आणून दिलं जातं. संपूर्ण गावातून येणाऱ्या भाकऱ्या या ठिकाणी जमा केल्या जातात. त्यानंतर पालखी त्या ठिकाणी आल्यानंतर वारकऱ्यांना त्याचं वाटपही याच ठिकाणी केलं जातं.
ट्रेंडिंग बातमी - तुकारामांच्या पालखीदरम्यान पावसाचा काय आहे अंदाज? कधी पावसाची शक्यता
भाकऱ्यांनंतर विषय ते येतो तो पिठल्याचा शिवाय अतिरीक्त भाकऱ्यांचा. त्याची जबाबदारी श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळ घेतं. त्यांच्या वतीने मंदिर परिसरात 300 किलो पिठाच्या भाकरी बनविण्यात येतात. गावातील प्रत्येक नागरिकांच्या घरी देखील भाकरी बनवून पालखी येण्यापूर्वी मंदिरात देण्यात येतात. याला अनेक वर्षांची परंपरा आहे. याकामात गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती हे मदतीसाठी येत असतात. यात पुरुषांबरोबर महिलांचाही सहभाग मोठा असतो ग्रामस्थ शितल शेळके यांनी सांगितलं. यातून मिळणार समाधान हे मोठं असतं असंही त्या सांगतात.