Ashadhi Wari 2026: महाराष्ट्राचे आध्यात्मिक वैभव असलेला आषाढी वारी दिंडी सोहळा सध्या सुरु आहे. विठ्ठल नामाचा गजर करत लाखो वारकरी पंढरीकडे जात आहेत. या वारकऱ्यांसाठी अनेक सोई-सुविधा प्रशासनाने उपलब्ध करुन दिल्या आहेत. वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागही लक्ष देत आहे. अशातच आषाढी वारीत आरोग्य पथकाने तत्परता दाखवत वेळीच 'सीपीआर देत वारकऱ्याचे प्राण वाचविण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
आरोग्य विभागाची तत्परता, वारकऱ्याचे प्राण वाचले!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आषाढी वारीदरम्यान एका वारकऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. मात्र आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे संबंधित वारकऱ्याला तातडीने जीवनरक्षक उपचार मिळाले. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, आरोग्यवर्धिनी केंद्र दिवे तसेच त्यांच्या समर्पित आरोग्य पथकाने प्रसंगावधान राखत तात्काळ सीपीआर (Cardio Pulmonary Resuscitation) देऊन प्राथमिक जीवनरक्षक उपचार सुरू केले. त्यानंतर रुग्णाला पुढील उपचारासाठी त्वरित वैद्यकीय संस्थेत हलविण्यात आले.
आरोग्य यंत्रणेची सज्जता, कौशल्य आणि सेवाभाव यामुळे आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी उपचार मिळाल्याने वारकऱ्याच्या जीव वाचण्यास मदत झाली. आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या आरोग्य पथकांच्या दक्षतेचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
या जीवनरक्षक कार्याबद्दल कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, आरोग्यवर्धिनी केंद्र दिवे तसेच संपूर्ण आरोग्य पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या तत्पर, संवेदनशील आणि समर्पित सेवेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अभिनंदन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world