अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune News : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दरवर्षी पुण्यातून दिवे घाट मार्गे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते. मात्र यंदा दिवे घाटातील रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामांमुळे पालखी सोहळ्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खोदकाम, नादुरुस्त रस्ते आणि डोंगराच्या उतारांवरील असुरक्षित परिस्थितीमुळे वारकरी आणि सेवेकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे.
दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, वारकऱ्यांचा संताप
पालखी मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था असल्याने वारकऱ्यांना अक्षरशः अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. त्यामुळे अनेक वारकऱ्यांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त करत खडे बोल सुनावले. वाढती गर्दी आणि बिकट परिस्थिती हाताळताना पोलीस प्रशासनालाही मोठी कसरत करावी लागली. दिवे घाटातील सुरू असलेल्या कामांमुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्नही वारकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. लाखो भाविकांच्या श्रद्धेचा आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा विचार करून पालखी मार्गावरील विकासकामांचे नियोजन अधिक जबाबदारीने करण्याची गरज व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी रस्ता पार करण्यासाठी उंच ढिगाऱ्यावरुन चढावं लागत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवे घाटात माऊलींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत होत आहे. अनेक संकटे आणि अडथळ्यांवर मात करत हैबतबाबांनी घालून दिलेल्या शिस्तीचे पालन करत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. मात्र भविष्यात अशा अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याची भावना वारकरी आणि सेवेकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world