आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari) वारकऱ्यांना सोईसुविधा मिळाव्यात यासाठी एसटी महामंडळाकडून (ST Corporation) अतिरिक्त बस सोडण्यात आल्या होत्या. दरम्यान एसटी महामंडळाला यामुळे मोठा नफा झाल्याचं समोर आलं आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
3 ते 10 जुलै दरम्यान एसटी बसेसनी 21 हजार 499 फेऱ्या करून तब्बल 9 लाख 71 हजार 683 भाविकांची सुरक्षितपणे ने-आण केली आहे. यातून एसटी महामंडळाला 35 कोटी 87 लाख 61 हजार रुपये इतके (almost 36 crores earned in 8 days during Ashadhi Wari) उत्पन्न मिळाले आहे. जे मागील वर्षी मिळालेल्या उत्पन्नापेक्षा 6 कोटी 96 लाख 3 हजार रुपयांनी जास्त आहे. (2024 साली आषाढी यात्रेचे एकूण उत्पन्न 28 कोटी 91 लाख 58 हजार रुपये इतके होते.) एवढे चांगले उत्पन्न आणून लाखो भाविकांना सुखरुप देवदर्शन घडवून आणणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व त्यांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी अभिनंदन पात्र आहेत, असंही मंत्री सरनाईक यावेळी म्हणाले.
नक्की वाचा - Raj Thackeray: राजेंच्या किल्ल्यांना युनेस्को यादीत स्थान, राज ठाकरेंची अभिनंदनासह खरमरीत पोस्ट, सरकारचे कान टोचले
आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक -प्रवाशी येत असतात. या भाविक- प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीने तब्बल 5 हजार 200 जादा बसेस सोडल्या होत्या.
हजारो एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था
आषाढी यात्रेच्या काळामध्ये पंढरपूरमध्ये येणाऱ्या एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची जेवणा अभावी गैरसोय होऊ नये, म्हणून परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून 5, 6 व 7 जुलै रोजी मोफत जेवण, चहा -नाश्त्याची सोय केली होती. याचा फायदा हजारो एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला. याबद्दल सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे आभार मानले आहेत.