अजितदादांसह बड्या नेत्याच्याही फोटोवर फुल्या, खरातच्या जादूटोण्यामागे कोणाचा मेंदू?रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Rohit Pawar: राशपचे आमदार रोहित पवार यांनी भोंदू अशोक खरातसंदर्भात धक्कादायक दावा केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Rohit Pawar: रोहित पवार यांचा अशोक खरातसंदर्भात खळबळजनक दावा"
IANS English

Rohit Pawar: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भोंदू अशोक खरात याचे वेगवेगळे धक्कादायक कारनामे बाहेर येत आहेत. यासंदर्भात राशपचे आमदार रोहित पवार यांनी धक्कादायक दावा केला आहे. भोंदू अशोक खरात याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील एका अत्यंत प्रभावशाली बड्या नेत्याच्या फोटोंवर फुली मारून जादूटोणा केल्याचा दावा त्यांनी केलाय. रोहित पवार यांच्या नव्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या भोंदूगिरीमागे नेमका कुणाचा मेंदू आहे?असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

(नक्की वाचा: Ashok Kharat : खरातच्या बंगल्यात एसआयटीची थरारक एन्ट्री! पत्नी फरार, मुलाला या पद्धतीनं पोलिसांनी उचललं)

अशोक खरातसंदर्भात रोहित पवार यांची खळबळजनक पोस्ट 

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, "जादूटोणासारख्या अंधश्रद्धांना महाराष्ट्र कधीही भीक घालत नाही परंतु जादूटोणा करणाऱ्या कलुषित मनोवृत्तींचा हेतू दुर्लक्षून चालणार नाही. भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचं समजतंय. या भोंदू खरातने कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला? ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता? हेही समोर येणं गरजेचं आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या महाराष्ट्रात कर्तृत्वापेक्षा आणि जनतेच्या कामांपेक्षा असल्या भोंदूगिरीवर विश्वास ठेवला जात असेल तर पुढच्या पिढीला काय संदेश जाणार आहे? हे प्रकरण जेवढं भयावह आहे तेवढंच महाराष्ट्राच्या भविष्यालाही घातक आहे. त्यामुळं या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा करणाऱ्या अंधभक्तांचे खरे चेहरे समोर यायलाच हवेत.

Advertisement

(नक्की वाचा: Exclusive: अशोक खरात प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती; नाशिकचे नामांकित डॉक्टर रडारवर, कारण...)

सत्य लपवण्यासाठी एवढा अट्टहास का?: रोहित पवार

दुसरीकडे रोहित पवार यांनी VSR कंपनीचा मालक व्ही.के.सिंग याला वाचवलं जात असल्याच्या गोष्टीकडे पुन्हा लक्ष वेधलंय. सोशल मीडिया पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटलंय की,"खूप काही जणांची खूप काही माहिती असलेल्या भोंदू खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत येऊन पोहचल्याने आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं तर दुसरीकडं अजितदादांच्या अपघाताची इत्तंभूत माहिती असलेल्या व्ही के सिंगला काहीही झालं तरी वाचवायचं अशा चर्चा आहेत. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, पण सत्य दडपण्यासाठी कोणाचा जीव घेतला जात असेल किंवा सत्य दडपण्यासाठी कोणाला दोषातून वाचवलं जात असेल तर या दोन्ही बाबी योग्य नाहीत. अशी राजकीय रणनीती कुणी आखत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला हे अजिबात आवडणार तर नाहीच उलट लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडेल. सत्य लपवण्यासाठी एवढा अट्टहास का? अशाने सत्य लपणार आहे का? असो, ‘कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपवता येत नाही, ते कधीतरी बाहेर येतंच' याचा अनेकांना विसर पडलेला दिसतोय."