आकाश सावंत, बीड:
Beed Crime: बीड जिल्ह्यामधील मारामारी अन् दहशत माजवण्याच्या घटना काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. अशीच धक्कादायक घटना बीडच्या गेवराईमध्ये घडली आहे. गेवराईच्या चोपड्याचीवाडी येथ चार घरांवर 30 जणांकडून हल्ला करत साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे. या मारहाणीत तीन महिला जखमी झाल्या आहेत.
बीडमध्ये कुटुंबावर हल्ला
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या गेवराई तालुक्यातील चोपड्याचीवाडी येथे कुटुंबावर जमावाने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्षुल्लक कारणावरुन 30 लोकांनी सायंकाळच्या सुमारास लाठ्याकाठ्यांनी महिलांना मारहाण करत घरांसह साहित्यांची तोडफोड केली. या मारहाणीमध्ये तीन महिला जखमी झाल्या असून बीडच्या जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
तलवाडा पोलीस ठाण्यात 30 आरोपींच्या विरोधात छेडछाड आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी फोनवरून बोलताना दिली. गायरान परिसरात राहत असलेल्या ठिकाणी मेंढ्या आल्याने सदरील कुटुंबांनी त्यांना बाहेर काढले यावरून हा वाद वाढला आणि थेट चार घरांची तोडफोड करण्यात आली आहे.
गावात तणाव
दरम्यान सदरील कुटुंबांनी शासनाच्या गायरानावर अतिक्रमण केले असून तेथे गेलेल्या दोन मेंढ्या मारून मेंढपाळ लोकांना मारहाण केली असुन गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी आरोपीच्या गटाने तलवाडा पोलिसांना निवेदन देऊन केली आहे.
(नक्की वाचा- Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमान अपघाताचं गुढ उकलणार? रोहित पवार मोठा निर्णय घेणार? दिल्लीत हालचाली)