
आकाश सावंत, बीड: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरु आहे. चार दिवसांपूर्वी बीडच्या गेवराईमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही दुर्घटना ताजी असतानाच बीडमध्ये आणखी एक मोठी दुर्घटना घडली असून भरधाव ट्रकने रिक्षाला दिलेल्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला आहे तर यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पालखी महामार्गावरील तेलगाव-माजलगाव रस्त्यावर नित्रुड गावाजवळ रविवारी रात्री 11.30 वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. मृतांत पती-पत्नीचा समावेश आहे.
रिक्षामधील सर्व प्रवासी हे सीरसाळा येथून भाट वडगावकडे जात होते. यावेळी तेलगाव-माजलगाव रस्त्यावर त्यांच्या रिक्षाला ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रकने रिक्षाला जवळपास 50 ते 60 फुट अंतरापर्यंत फरफटत नेले. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे.
दुसरीकडे, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास पुणे लेनवर खालापूरजवळ शिवशाही बसचा अपघात झाला. बोईसर ते कोल्हापूर मार्गावर धावणाऱ्या या बसची अज्ञात वाहनाला धडक बसली त्यामुळे हा अपघात घडला. अपघातात चालक आणि वाहक यांच्यासह 13 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. प्रवाशांना एमजीएम रुग्णालय कामोठे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा पळस्पे, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य रुग्णालयाचे ॲम्बुलन्स, स्वामिनी ॲम्बुलन्स सर्विस या यंत्रणांनी या अपघातात मदतकार्य केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world