Mumbai 6-Lane Cable-Stated Bridge: ट्रॅफिकने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अन् आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई उपनगरातील पश्चिम भागातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलेल्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गोरेगाव खाडीवर एक आधुनिक सहा पदरी केबल-स्टेड पूल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
महत्वाचं म्हणजे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आहे. या महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी सुमारे ४१८.५३ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित असून, यामुळे उपनगरातील दळणवळणाला एक नवी गती आणि आधुनिक चेहरा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका
समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या तांत्रिक रचनेचा विचार केल्यास, या प्रस्तावित पुलाची एकूण लांबी ५४२ मीटर असणार आहे. यातील मुख्य आकर्षण म्हणजे २३८ मीटरचा हिस्सा हा अत्याधुनिक केबल-स्टेड डिझाइनचा वापर करून बांधला जाईल, ज्यामुळे खाडीतील सागरी पर्यावरणाला हानी न पोहोचवता पुलाची उभारणी करणे शक्य होणार आहे.
या पुलाची एकूण रुंदी २८.५५ मीटर निश्चित करण्यात आली असून, वाहतुकीच्या सहा मार्गिकांव्यतिरिक्त पुलाच्या दोन्ही बाजूंना १.५ मीटर रुंदीचा एक विशेष युटिलिटी कॉरिडॉर देखील विकसित केला जाणार आहे, ज्याचा उपयोग भविष्यातील सेवा वाहिन्यांसाठी केला जाईल. महापालिकेने या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी अत्यंत काटेकोर नियोजन केले आहे. पावसाळ्याचे महिने वगळून पुढील ३६ महिन्यांच्या कालावधीत हे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
वर्दळीच्या ठिकाणची वाहतूक कोंडी सुटणार?
सर्व तांत्रिक बाबी वेळेत पूर्ण झाल्यास ऑक्टोबर २०२८ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. हा पूल कार्यान्वित झाल्यानंतर अंधेरी, ओशिवारा, लोखंडवाला आणि गोरेगाव यांसारख्या अत्यंत गजबजलेल्या आणि नेहमीच वाहतूक कोंडीने वेढलेल्या परिसरातील वाहनांची गर्दी लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world