![Chhatrapati Shivaji Maharaj : पुरंदरचा तह का झाला? राजे आग्र्याला का गेले, कुठे मुक्काम केला? महाराज-औरंगजेब भेटीचा सविस्तर वृत्तांत Chhatrapati Shivaji Maharaj : पुरंदरचा तह का झाला? राजे आग्र्याला का गेले, कुठे मुक्काम केला? महाराज-औरंगजेब भेटीचा सविस्तर वृत्तांत](https://c.ndtvimg.com/2025-02/7hap65v_shivaji-maharaj_625x300_10_February_25.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
Chhatrapati Shivaji Maharaj Agra Visit : ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) अवघा महाराष्ट्र दैवत मानतो, ज्या शिवछत्रपतींनी मुघलांना नामोहरम केलं, त्या शिवाजी महाराजांबद्दल असं वक्तव्य झालं आणि महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली. चित्रपट अभिनेता राहुल सोलापूरकरनं एका पॉडकास्टमध्ये शिवरायांनी मुघलांना लाच दिल्याचा दावा केला आहे. सोलापूरकर हे काही इतिहाससंशोधक नाहीत. त्यांनी चित्रपटांमध्ये शाहू महाराजांचं पात्र साकारलंय. असं असतानाही, सोलापूरकरांनी असा दावा केला आहे. इतिहास सांगतो त्यानुसार, मुघल बादशाह औरंगजेबानं तर शिवाजी महाराजांच्या हत्येचे आदेश काढले होते. त्यासाठी महाराजांना सलाबत खानाच्या हवेलीत नजरकैदेत टाकले होते. त्या 64 दिवसांच्या नजरकैदेत, राजेंचे सुटकेचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी त्यांनी मुघल मनसबदारांना आपल्या दिशेने वळवण्याचे प्रयत्नही केले.
आपल्या मनसबदारांच्या सुटकेसाठी औरंगजेबाला खलितेही लिहिले. आजारपणाचा बहाणा करुन, रयतेला खैरात वाटण्याचा इरादाही व्यक्त केला. आणि बंदोबस्ताचं कडं शिथील होताच, मुघल सल्तनतीच्या हातावर तुरी देऊन लहानग्या संभाजीसह स्वराज्यही गाठलं. आपल्याला हा इतिहास माहिती आहे. मात्र यापूर्वीचा इतिहास नेमका काय होता. शिवाजी महाराजांना पकडणं कोणत्याच मुघलाला शक्य होत नव्हतं. महाराज आणि जयसिंग मिर्झामध्ये झालेला पुरंदरचा तह का झाला? महाराज आग्र्याला का गेले, आग्र्याला जाताना त्यांनी कुठे मुक्काम केला, याचा सविस्तर घेतलेला आढावा.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजस्थानचं गुलाबी शहर जयपूरमध्ये शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची सुरुवात झाल्याचं इतिहासात नमूद आहे. अरवलीतील डोंगररांगातील आमीर संस्थानचा मिर्झा जयसिंग हा इथला संस्थानिक. हा मुघलांचा सहा हजारी मनसबदार होता. छत्रपतींविरोधात मातब्बर सरदार अपयशी ठरल्यानंतर औरंगजेबाने राजपूत जयसिंह मिर्झाकडे स्वराज्य संपविण्याची जबाबदारी सोपवली होती. मिर्झाराजे जयसिंह यांचं जयपूर घराणं अत्यंत पराक्रमी होतं. मात्र ते मुघलांचे निष्ठावान मानले जात होते. जोधा-अकबरापासून या घराण्याने सातत्याने मुघलांशी रक्त नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला. म्हणून कदाचित त्यांना मुघलांनी 'मिर्झा' म्हणजेच राजपूत्र अशी पदवी दिल्याची शक्यता आहे. औरंगजेब शिवाजी महाराजांचा पाडाव करण्यासाठी उतावीळ झाला होता. ज्यावेळी मिर्झाराजे दख्खनच्या मोहिमेवर निघाले त्यावेळी औरंगजेबाने स्वत:च्या हाताने मिर्झाराजे यांना गळ्यातील मोत्याची माळ आणि अंगातला कबा भेट म्हणून दिला होता.
नक्की वाचा - अभिनेते राहुल सोलापूरकर यांची अखेर दिलगिरी! शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर स्पष्टीकरण
स्वराज्य संपविण्यासाठी मुघलांकडून मोठी तयारी करण्यात आली होती. आंबेर किल्ल्यातील दिवाण-ए-खासमध्ये दख्खन मोहीमेसाठी एक महिनाभर खलबतं झाली. सरदार ठरविण्यात आले, मिर्झाच्या दिमतीला 40 हजार सैन्य जमले. संस्थानाच्या तिजोरीतील एक कोटी घेऊन 30 सप्टेंबर 1664 ला मिर्झाने जयपूर सोडलं. जयपूर सोडल्यानंतर मिर्झाची पहिली नजर पुण्याच्या पुरंदरकडे गेली. भुलेश्वर डोंगररांगातील किल्ले पुरंदर आणि वज्रगडाला मिर्झा आणि दिलेरखानाच्या फौजाने वेढा घातला. गडांच्या चारही बाजूंनी मुघल फौज पसरली.
नक्की वाचा : Viral Video: 'शिवाजी महाराज लाच देऊन सुटले...' मराठी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान, नेटकऱ्यांचा संताप; VIDEO व्हायरल
वज्रगडावर 300 आणि पुरंदरवर 2 हजार मराठे होते. पण ते डमगमले नाहीत. या डोंगराच्या दिशेने तोफा वर चढवून मिर्झाने वज्रगड घेतला. त्यामुळे लढाईचा नूर पालटला. वज्रगडावरुन पुरंदरच्या माचीवर मारा करणं त्याला सोपं झालं. मिर्झाने आणखी एक रणनीती आखली. पुरंदरपासून राजगडापर्यंत मुघल फौजेने अनेक ठिकाणी आग लावल्या. महिलांचं अपहरण केलं. शेतं-घरदारं पेटवून दिली. प्रजेच्या रक्षणासाठी महाराजांना मिर्झाराजेसोबत नारायणगावला तह करणं भाग पाडलं.
महाराजांच्या आग्रा मोहिमेच्या पाऊलखुणांचा शोध घेताना अनेक कागदपत्रं बिकानेरमध्ये पाहायला मिळतात. महाराज आणि मिर्झाराजे यांच्यातील पुरंदरचा तह झाला त्या तहाची संधी, ड्राफ्ट 22 फूट लांबीची आहे. जयपूरपासून 350 किमी अंतरावर बिकानेरमध्ये राजस्थान सरकारच्या मुख्य अर्काइव्ह विभागात ही संधी ठेवण्यात आली आहे. याचे संचालक महेंद्र खडगावत सांगतात, ही संधी पर्शियन भाषेत आहे. या करारानुसार महाराजांनी स्वराज्यातील किल्ले 23 आणि 4 होन इतका भागा मिर्झाराजेंना द्यावा लागला. त्यासाठी हा ड्राफ्ट बनविण्यात आला होता. मात्र यावर दोघांची स्वाक्षरी नाही. त्यावेळी या संधीवर स्वाक्षरी झालेली नव्हती. मात्र त्यावर मोहोर आहे. छत्रपती शिवाजी महाराज हरल्यानंतर औरंगजेबने ही पुरंदरची संधी केली होती. या करारात 23 किल्ल्यांची संपूर्ण माहिती आहे. या तहानुसार महाराजांनी प्रत्यक्षात पुरंदरच्या तहानुसार केवळ 19 किल्ले दिले होते. या करारानुसार, महाराजांनी मूळचा स्वराजातील तोरणागड, राजगड आपल्याकडे ठेवलं होतं. पूरंदरच्या तहाच्या दीड फूट रुंदीच्या करारनाम्यासाठी रोषनाई इंक म्हणजे भाज्यांपासून तयार करण्यात आलेली शाई वापरली होती. पूरंदरवर मराठ्यांचा शूर शत्रू नमला म्हणून बादशहाने करारनाम्यावर सोन्याची किनार दिली होती. हे अशा पद्धतीचं जगातील एकमेक करारपत्र असल्याचं म्हटलं जातं.
पूरंदरच्या तहामुळे (Treaty of Purandar) विजापूरच्या आदिलशाहीवर कठीण प्रसंग आला होता. महाराजांना मुघलांच्या बाजूने आदिवाशाहीविरुद्ध दोन लढाया लढायला लागल्या. पण गोल घुमुटावर मराठे-मुघलांची संयुक्त फळी फसल्यावर मिर्झाने महाराजांकडे आग्रा भेटीचा आग्रह धरला.
शिवाजी महाराज त्यावेळी राजगडावर होते. मिर्झाकडून संदेश आल्यानंतर 5 मार्च 1665 ला महाराज राजगडाहून आग्र्याला निघाले. त्यावेळी राजांसोबत 9 वर्षांचे संभाजी, निवडक मनसबदार, पायदळ, घोडेस्वार होते. तेथून निघाल्यावर महाराजांनी जिजाऊंकडे स्वराज्याचा कारभार सोपवला. राजांच्या गैरहजेरीत जिजाऊंनी स्वराज्याचा गाडा हाकला. यादरम्यान मावळ्यांनी एक गडही जिंकला. दुसरीकडे राजे राजगडाहून पुणे, अहमदनगर, औरंगाबाद करीत निघाले आग्र्याच्या दिशेने निघाले.
औरंगाबादहून महाराज निघाले आणि त्यांचा पुढचा मुक्काम बुऱ्हाणपूरचा होता. याला दक्षिणेचं प्रवेशद्वार म्हणतात. 6 एप्रिल 1666 ला राजेंना औरंगजेबाचं पत्र मिळालं. तो लिहितो, मिर्झाराजेने ठरविल्याप्रमाणे भेटीचा कार्यक्रम ठरला. तुमच्यासाठी पोशाख पाठवला आहे तो घ्यावा. या पत्रात औरंगजेब निरोपाची भाषा करीत होता. उलट त्याने राजेंना नजरकैद झाली. यानंतर महाराजांचा दुसरा मुक्काम ग्वाल्हेरचा होता. बुऱ्हाणपूर भोपाळ-धौलपूर मार्गे राजे आग्र्याकडे निघाले. महाराज आग्र्याकडे निघाले तेव्हा ते मधेमधे थांबायचे. ते ज्या ठिकाणी मुक्काम करायचे त्याला सराया म्हणतात. येथे सरदारांसाठी तंबू, घोडे, हत्ती यांच्यासाठी चारा आणि पाण्याची सोय करण्यात आली होती. याशिवाय हिंदू-मुस्लीमांनुसार आणि हुद्द्यानुसार सोय केली होती.
आग्र्याच्या हद्दीत येताच बादशहाने महाराजांचा अवमान सुरू केला.
दरबारी प्रथेप्रमाणे शिवाजी राजेंचं स्वागत करायला हवं होतं. मात्र तसं झालं नाही. येथे मिर्झाराजेंचा मुलगा रामसिंहाचा मुन्शी आला. रामसिंह हा मुघलांचा दोन हजारी मनसबदार होता. त्याला येथील गस्तीचं काम देण्यात आलं. येथून राजे लाल किल्ल्याकडे निघाले. सराईतून निघालेल्या मुन्शीने एका राजस्थानी पत्रात महाराज भेटीचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. धुंडानी भाषेत हे पत्र लिहिण्यात आलं आहे. जयपूर घराण्यातील दिवाणाला लिहिलेला हा पत्रव्यवहार आहे. या प्रत्येक पत्रावर महाराजांच्या आग्रा भेटीचा गौरवपूर्ण उल्लेख आहे.
नक्की वाचा - मालवणात पुन्हा शिवरायांचा पुतळा उभारणार, किती दिवसात पूर्ण होणार आणि किती खर्च येणार?
औरंगजेबाच्या वाढदिवशी दुपारी राजे लाल किल्ल्यात पोहोचले.
औरंगजेबाच्या 50 व्या वाढदिवशी दिवाणे आममध्ये महाराजांची भेट ठरली होती. 208 फूट लांबीचा आणि 70 फूट उंचीचा दिवाण-ए-आम त्यादिवशी खास सजला होता. इथं येत असताना रामसिंह आणि महाराजांची चुकामूक झाली आणि महाराज वेळेवर पोहोचू शकले नाहीत. यानंतर कंटाळलेला बादशहा दिवाण-ए-खासकडे निघून गेला. दिवाण-ए-खासमध्ये बादशहा आणि महाराजांची भेट झाली. दिवाण-ए-खास हा फक्त गुप्त खलबतं करण्यासाठी होता. बादशहासमोर त्याची मंडळी बसली होती. तिसऱ्या क्रमांच्या रांगेत शिवाजी महाराजांना उभं करण्यात आलं होतं. हा महाराजांचा मोठा अवमान होता. ती चार हजार मनसबदारांची रांग होती. यावर महाराज चिडले व म्हणाले, मी बादशहाची कुठलीही मनसब स्वीकारणार नाही. हुजुरी करणार नाही. यानंतर राजे तडक तेथून निघून गेले. पुढचे 99 दिवस महाराज आग्र्यात राहिले मात्र औरंगजेबाची भेट घेण्यासाठी कधीच दिवाण-ए- खासमध्ये आले नाहीत.
राजेंना मारण्याचे आदेश...
औरंगजेब हा राजेंच्या हत्येची तयारी करीत होता. त्याने राजेंना ठार मारण्याचे आदेश दिले. लाल किल्ल्यात राजेंविरोधात कट कारस्थान केले जात होते. जयसिंह आणि बड्या बेगमने राजेंविरोधात मोहीम सुरू केली. रामसिंह राज्यांच्या मदतीला धावला. बादशहांचा कावा लक्षात येताच राजेंनी रणनीती बदलली. आग्र्यातील बाजारातील नजराणे खरेदी करून बादशहाच्या दरबारींना भेटवस्तू पाठवण्याचा सपाटाच लावला. औरंगजेबाचा दरबार राजांना वश झाला. बडी बेगम, रामसिंह, बादशहाचा वजीर मिरबक्ष राजांच्या बाजूने बोलू लागले. राजेंनी रामसिंहाला 67,500 रुपये लागतील असा ड्राफ्ट राजेंच्या सहीचा तयार करून घेतला. हे पैसे तुम्ही आम्हाला द्या.. हे परत सहव्याज परत करू, असा खलीता रामसिंहांकडे दिला. तो मिर्झाराजे जयसिंह यांना बीडमध्ये पाठवला आणि राजे आग्र्याच्या संघर्षात असताना जिजाऊंनी हे पैसे आपल्या खजिन्यातून दिले.
नक्की वाचा - 'जीभ हासडली पाहिजे, गोळ्या घालून मारा...' सोलापूरकरांच्या वक्तव्यावर उदयनराजेंनी सुनावली शिक्षा
इच्छा असूनही बादशहाला राजांना मारण्यात अडचणी येत होत्या. यानंतर राजेंना नजरकैदत टाकण्यात आलं. एक हजार सैनिक राजेंवर लक्ष देऊ लागले. राजे राहत होते तिथं चारही बाजूने चौक्या बसवण्यात आल्या होत्या. यावेळी राजेंनी एक खेळी खेळली. त्यांनी बादशहाकडे आपल्या सोबत आणलेल्या मनसबदारांना परत पाठविण्यासाठी परवाने देण्याची विनंती केली. परवान्याच्या जाळ्यात राजेंचे लोक कमी होतील यातून राजेंनी स्वत:चा खोटा परवाना बनवून घेतला. त्याच्या एक दिवस आधी 18 ऑगस्ट 1666 ला राजेंना ठार मारण्याचा आदेश दिला. त्याच्या एक दिवस आधी आग्र्यात राजेंनी इतिहास घडवा.
महाराज आग्र्याहून निसटले...
महाराजांनी शिताफीने खोटा परवाना बनवून घेतला. 8 ऑगस्ट 1666 ला औरंगजेबाने राजांना ठार मारण्याचा आदेश दिला होता. त्याच्या एक दिवस आधी 17 ऑगस्टला आग्र्यात शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले. आग्र्यातून 99 व्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी बादशहाच्या हातावर तुरी देऊन तेथून निसटले. महाराज फळांच्या पेटीतून आग्र्यातून निसटल्याचं इतिहासकारांचं म्हणणं आहे. महाराजांची रणनीती अशी होती की, त्यांनी आग्रा सोडल्याच्या 18 तासांनी बादशहाला ही माहिती कळाली. यानंतर अडीच लाख मुघल फौज राजांना शोधायला निघाले. आग्र्याहून निघाल्यानंतर राजे राजगडाच्या दिशेने दक्षिणेकडे न जाता, उत्तरेकडे मथुरेला गेले. मुघलांना हा चकवा होता. त्यांनी संभाजीराजेंना कृष्णाजी पंतांच्या घरी ठेवलं. मथुरेहून आग्रा, अलाहाबाद, काशी, गया, रायपूर, चंद्रपूर, हुबळी, मंगळवेढा, असा 4500 हजार किमीचा प्रवास साधुच्या वेशात पायी चालत राजे रायगडात दाखल झाले, असं काही इतिहासतज्ज्ञांचं म्हणणं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world