'शिवविचारांचा पाईक असणा-या कोणालाच ते मान्य होणार नाही' उदयनराजेंनी दिला कुणाला इशारा?

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या विषयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
C
मुंबई:

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावर सोमवारी (26 ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. महाविकास आघाडीनं या प्रकरणात राज्य तसंच केंद्र सरकारला लक्ष्य केलंय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात जनतेची माफी मागितली आहे. दोन्ही बाजूनं राजकारण तापलेलं असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या विषयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले उदयनराजे?

राजकोट (मालवण) येथे घडलेली दुर्घटना ही निश्चितच दुर्दैवी आणि अपघाती आहे. या दुर्दैवी घटनेचे कोणी स्वत:च्या लाभासाठी राजकारण करुन भांडवल करु नये. विशेष कोणाला लक्ष्य बनविणे टाळले पाहीजे असे आवाहन करतो, असं उदयनराजेंनी स्पष्ट केलंय. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकांनी संयम पाळावा असं आवाहनही त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून केलं आहे.

या घटनेचे भांडवल करणा-यांकडून, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी कृत्ये होत असतील तर शिवविचारांचा पाईक असणा-या कोणालाच ते मान्य होणार नाही, असंही त्यांनी बजावलं आहे. 

( नक्की वाचा : शिवाजी महाराजांची माफी, सावरकरांचा उल्लेख, मोदींनी कसं बदललं राज्याचं राजकारण? )

उदयनराजे यांची संपूर्ण पोस्ट

राजकोट (मालवण) येथे घडलेली दुर्घटना ही निश्चितच दुर्दैवी आणि अपघाती आहे. देशातील सर्व जाती, धर्मातील नागरिकांमध्ये या घटनेचे दु:ख आहे. पुतळा उभारणीतील कच्चे दुवे आणि निसर्गाची अवकृपा या आणि केवळ याच कारणांमुळे  छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनेचे कोणी स्वत:च्या लाभासाठी राजकारण करुन भांडवल करु नये. विशेष कोणाला लक्ष्य बनविणे टाळले पाहीजे असे आवाहन करतो.

Advertisement

या आवाहना बरोबरच , समाजाने संयम बाळगावा. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शासन झालेच पाहिजे  आणि समुद्रतटीय निसर्गनियमांचा आणि वातावरणातील बदलांचा सखोल अभ्यास करुन, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वांना प्रेरणा देणारा पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी उभारला जावा.

( नक्की वाचा : 'शरद पवारांना हे शोभत नाही,' पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार )

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक कार्याचा आमच्यासह तमाम देशवासियांना सार्थ अभिमान आहे. त्यांची शिकवण आणि राज्यकारभार आजच्या घडीला सुध्दा अत्यंत उपयुक्त आहे. त्यांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेवून करोडो व्यक्तींनी आपल्या जीवनाची आदर्शवत वाटचाल केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अल्प आयुष्यातील, अतुलनीय आणि अजोड कार्य आपल्या सर्वांच्या जीवनातील प्रत्येक वळणावर एका दिपस्तंभा सारखे आहे. सामाजिक स्तरातील सर्वांना सातत्याने प्रेरणा देणा-या अशा थोर महापराक्रमी राजाविषयी सर्वांनाच नितांत आदर आहे. 

Advertisement

राजकोट येथील पुतळा कोसळण्याची दुर्घटना निश्चितच प्रत्येकाच्या मनाला क्लेशदायीच आणि निषेधार्ह आहे. तथापि या घटनेचे भांडवल करणा-यांकडून, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी कृत्ये होत असतील तर शिवविचारांचा पाईक असणा-या कोणालाच ते मान्य होणार नाही. म्हणूनच समाजातील प्रत्येक घटकांनी संयम बाळगला पाहिजे. या घटनेच्या सखोल चौकशीअंती जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शासन व्हावे आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी भव्य पुतळा त्याच ठिकाणी पुन्हा दिमाखात उभारला पाहीजे.

Advertisement