Ahilyanagar Rain News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री 3 वाजेच्या सुमारास पावसाने अचानक जोर धरला आणि विशेषतः तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक तास मुसळधार पाऊस कोसळत राहिला.
या अतिवृष्टीमुळे करंजी, मढी यांसह अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. काही गावांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांनी झाडांवर आणि उंच ठिकाणी आसरा घेतला. वाहने आणि जनावरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.
राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. कल्याण–विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग, बारामती–छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग तसेच पाथर्डी–बीड मार्गावरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने हे मार्ग बंद करण्यात आले होते. काही ठिकाणी सकाळपासून वाहतूक हळूहळू सुरू झाली आहे. पाथर्डी शहरातही पूरपरिस्थिती निर्माण झाली. कसबा विभागातील खोलेश्वर मंदिर, तपनेश्वर मंदिर, मी मंदिर परिसर तसेच आमराई मंदिर परिसर पाण्याखाली गेला. सलग तीन दिवस मुसळधार पावसामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. शेतजमिनी वाहून गेल्या असून उभ्या पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
नक्की वाचा - Mumbai Rain Upate : मुसळधार पावसामुळे वाहतुकीचे तीन तेरा, ठिकठिकाणी पाणा साचल्याने मोठी वाहतूक कोंडी
करंजी गावात पुरात अडकलेल्या सोळा नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्यासह महसूल विभाग, पोलीस दल, महानगरपालिकेचे अग्निशमन पथक आणि स्थानिक नागरिक मदत व बचाव कार्यात गुंतले आहेत. चाळीस वर्षांनंतर एवढा प्रचंड पाऊस झाल्याची आठवण स्थानिक नागरिकांनी दिली. नदीपात्र आकुंचन झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह गावात शिरून नदीकाठच्या वस्त्यांना मोठा फटका बसला आहे.
बाजरी, कापूस, तूर, मूग यांसह अनेक पिके व फळबागांचे नुकसान झाले. काही विहिरी दगड, वाळू व चिखलाने भरून गेल्या. वीजवाहक पोल आणि रोहित्रे निकामी होऊन वीजपुरवठा खंडित झाला आहे. कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले असून साठवलेला कांदाही वाहून गेला आहे. कासार पिंपळगाव–जवखेडे दुमाला तसेच जवखेडे खालसा या भागातील पुलांवरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नदीकाठ आणि तलाव परिसरातील लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून काहींना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. महादेव भगवान मरकड यांच्या ड्रॅगन फ्रुट बागेचेही पूर्णतः नुकसान झाले असून बागेतून पाणी वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.