साजन धाबे, प्रतिनिधी
Maharashtra Police: पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष मारहाणीत संशयित तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या बेग्या पवार या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल न्यायालयाने तत्कालीन ठाणेदारासह 9 पोलिसांना थेट जन्मठेपेची कडक शिक्षा सुनावली आहे. तब्बल 15 वर्षे, 1 महिना आणि 23 दिवस चाललेल्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर पीडित पारधी कुटुंबाला हा न्याय मिळाला आहे.
काय आहे प्रकरण?
हे संपूर्ण प्रकरण 9 मे 2011 रोजी घडले होते. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या वाढोणा येथील पारधी वस्तीवर रिसोड पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे आणि इतर 8 पोलीस कर्मचाऱ्यांनी धाड टाकली होती. त्यांनी एका चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून बेग्या पवार या तरुणाला ताब्यात घेतले होते. मात्र, रिसोड पोलिसांनी गुन्हा कबूल करण्यासाठी पोलीस कोठडीत बेग्याला अमानुष मारहाण केली. या मारहाणीतच 10 मे 2011 रोजी त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याण हादरले! कर्ज मंजूर झाल्याचे सांगून महिलेला घरात बोलावले, दरवाजा बंद केला आणि पुढे... )
सीआयडी तपास आणि 15 वर्षांचा संघर्ष
या मृत्यूनंतर बेग्या पवार यांच्या आई-वडिलांनी पोलिसांविरोधात न्यायाचा लढा सुरू केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन याचा तपास सीआयडीकडे (CID) सोपवण्यात आला होता. सीआयडीने सखोल तपास करून दोषी पोलिसांविरुद्ध खुनाचा आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात तब्बल 15 वर्षे ही क्लिष्ट कायदेशीर लढाई सुरू होती. प्रत्येक तारखेला उपस्थित राहून पीडित कुटुंबाने आपला संघर्ष सुरू ठेवला होता.
तत्कालीन ठाणेदारासह 9 जणांना जन्मठेप
वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सीआयडीने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून 9 पोलिसांना दोषी ठरवले. यामध्ये तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे, मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव भगवान खांडके, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कणिराम जाधव यांचा समावेश असून या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: मलम लावले अन् आजार आणखीच वाढला; KDMC च्या हॉस्पिटलवर रुग्णाचा गंभीर आरोप, प्रकरण काय? )
न्यायालयाच्या या निकालानंतर बेग्या पवार यांच्या आई-वडिलांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, आमचा मुलगा परत येणार नाही, मात्र त्याच्यावर झालेल्या अन्यायाला आज पूर्ण न्याय मिळाला आहे. पीडित कुटुंबाची बाजू मांडणारे सरकारी वकील श्रीराम काळू यांनी सांगितले की, हा निकाल पोलीस प्रशासनाला चपराक देणारा असून कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि सर्वसामान्यांना उशिरा का होईना पण न्याय मिळतो, हा विश्वास या निर्णयामुळे पुन्हा एकदा दृढ झाला आहे.