ओंकार कुलकर्णी, धाराशिव
Dharashiv Zilla Parishad: वाढता 'स्क्रीन टाईम' आणि सोशल मीडियाच्या आहारी जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी धाराशिव जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात रात्री 7 ते 9 या वेळेत टीव्ही आणि मोबाईल बाजूला सारून विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी जाहीर केला आहे.
काय आहे निर्णय?
केवळ कागदावर निर्णय न ठेवता, अर्चना पाटील यांनी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी 'ग्राऊंड लेव्हल' प्लॅनिंग केले आहे. दररोज रात्री 7 वाजता गावागावातील मंदिरांवर किंवा ग्रामपंचायतीवर बसवलेले भोंगे वाजवले जातील. हा भोंगा वाजताच घरातील टीव्ही बंद करून विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे.
(नक्की वाचा- Mumbai News: मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! पावसाळ्यापूर्वी 'हे' पूल होणार खुले; BMC कडून डेडलाईन जाहीर)
ज्याप्रमाणे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांविरुद्ध 'गुड मॉर्निंग' पथक काम करायचे, त्याच धर्तीवर आता गावात शिक्षण निरीक्षक आणि ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचे विशेष पथक रात्री 7 ते 9 दरम्यान गस्त घालेल. घरोघरी जाऊन टीव्ही बंद आहे की नाही आणि मुले अभ्यास करत आहेत का, याची खातरजमा हे पथक करेल.
स्टडी रूम आणि शिक्षकांची उपलब्धता
विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे म्हणून अध्यक्षा अर्चना पाटील यांनी आणखी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सुसज्ज स्टडी रूम (अभ्यासिका) सुरू करण्यात येतील. शाळा सुटल्यानंतर देखील ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी आहेत, त्यांच्यासाठी शिक्षक उपलब्ध करून दिले जातील. ग्रामीण भागातील मुलांची स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षांमधील कामगिरी सुधारणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
(नक्की वाचा- Nashik News: दिंडोरीत कार विहिरीत कोसळून भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू)
अर्चना पाटील यांचे पालकांना आवाहन
"मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी दोन तास टीव्हीचा त्याग करावा. हे केवळ प्रशासनाचे काम नसून संपूर्ण समाजाचे योगदान आहे," असे आवाहन अर्चना पाटील यांनी दिले आहे. या निर्णयाचे शैक्षणिक वर्तुळातून स्वागत होत असले तरी, घराघरातील टीव्ही बंद करण्याच्या सक्तीवर लोक काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.