नागिंद मोरे, प्रतिनिधी
Dhule News : पिंपळनेर येथे आनंदोत्सवासाठी जमलेले लग्नघर अचानक भीषण हिंसाचाराने हादरलं. पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात गोसावी समाजाच्या लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चौघेजण गंभीर जखमी आहेत. ही घटना आज (१९ फेब्रुवारी २०२६) दुपारच्या सुमारास घडली.
धारदार शस्त्राने हल्ला
साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री आणि सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होता. साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्स अॅपवर आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडिओ प्रसारित केल्याने तणाव अधिक वाढला. याच वादातून लग्नस्थळी अचानक कुरापत काढत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे.
तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी...
या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (वय ३५), सुरेश गोसावी (वय ५५) आणि साहील सुरेश गोसावी (वय २२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच पंकज अशोक गीर, सुरेश सुपडू गीर आणि सागर गोसावी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गंभीर जखमींपैकी एकास पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. या प्रकरणी कानागिरी मुलागिरी गोसावी, यशवंत गोपाल गोसावी, अनिल गिरी हटुगिरी गोसावी, सोनुगिरी गोसावी, विजुगिरी हटुगिरी गोसावी, कमलेश गिरी शंभू गिरी गोसावी आणि हर्ष शंभू गोसावी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. लग्नसोहळ्यातील रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.