Warkari Sampraday Controversy : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वारकरी संप्रदायातील विचारांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात मोठा कलगीतुरा रंगला आहे. शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाल्याचा दावा केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पवारांचा हा लेख चुकीचा असून त्यांनी अशी मांडणी करायला नको होती, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या माहितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे आता वारकरी विचारांच्या मांडणीवरून नवीन वाद उभा राहिला आहे.
शरद पवारांचा दावा आणि यादीचे राजकारण
महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत शरद पवार यांनी एक लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी वारकरी संप्रदायावर भाष्य करताना गंभीर आरोप केले आहेत. संप्रदायातील 60 टक्के लोक सध्या धर्मांध शक्तींना बळ मिळेल अशी मांडणी करत असून, यात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली आहे, असे पवार म्हणाले.
इतकेच नाही तर अशा लोकांची यादी करण्यास आपण सुरुवात केली असून, सध्या केवळ 40 लोकच पुरोगामी भूमिका मांडताना दिसत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : नाशिकची 'ती' बडी कंपनी 'कॉर्पोरेट जिहाद' चा अड्डा ! मशिदीत ट्रेनिंग ते ऑफिसमध्ये बीफ, वाचा हादरवणारी माहिती )
मुख्यमंत्र्यांचे थेट प्रत्युत्तर
शरद पवारांच्या या विधानावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री म्हणाले की, शरद पवार स्वतःला निधर्मी मानतात, पण वारकरी संप्रदायाबाबत त्यांच्याकडे योग्य माहिती नसावी. वारकरी संप्रदाय हा गेल्या 800 ते 900 वर्षांपासून श्रद्धा आणि बंधुत्वाचा विचार मांडत आला आहे.
भागवत धर्माची पताका हाती घेऊन या संप्रदायाने नेहमीच समतेचा विचार जपला आहे, अशा शब्दांत त्यांनी पवारांच्या भूमिकेचा निषेध केला.
अर्बन नक्षलवादाशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप
या वादात मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठा दावा केला तो म्हणजे अर्बन नक्षलवादाचा. वारकरी संप्रदायात काही लोक शिरून वेगळा आणि विघातक विचार मांडत होते, त्यांना संप्रदायाने आधीच बाहेर काढले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. वारकरी विचारांच्या विरोधात जाणाऱ्यांची यादी माझ्याकडेही आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी खळबळ उडवून दिली. संप्रदायात घुसखोरी करू पाहणाऱ्या काही लोकांचा संबंध थेट अर्बन नक्षल चळवळीशी असल्याचे पाहायला मिळाले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
साहित्य संमेलनातील लेखावर टिप्पणी
साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत पवारांचा लेख घेण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, साहित्य संमेलनात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असतो. शरद पवार यांचे राजकीय क्षेत्रातील मोठे योगदान पाहता त्यांचा लेख स्मरणिकेत घेतला असावा. मात्र, त्यांनी केलेली मांडणी वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलीन करणारी आहे, असा सूर मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून उमटला. या संपूर्ण प्रकरणामुळे वारकरी संप्रदाय आणि त्यातील विचारधारा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world