मनीष रक्षमवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारली आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकरी, मजूर,विद्यार्थी,महिलांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. फडणवीसही जिल्ह्यात फिरकत नाहीत. त्यात जिल्ह्यातल्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे लोकांना भेटायला वेळ नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने 'हेलिकॉप्टर घ्या; पण गाव किंवा तालुक्यात या', अशी घोषणा आंदोलन केलं. शिवाय यावेळी त्यांनी हेलिकॉप्टर वाटप आंदोलन ही केलं. हे आंदोलन आता चर्चेचा विषय ठरलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद घेऊन विकासाची जबाबदारी स्वतःकडे घेतली. मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यातील जनतेच्या समस्या कमी होण्याऐवजी अधिकच वाढत चालल्या आहेत. असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना अनेक अडचणींना समोरे जावं लागत आहे. पण त्याकडे फडणवीसांचे मात्र लक्ष्य नाही, असं ही काँग्रेसचं म्हणणं आहे.
ट्रेंडिंग बातमी - Plane crash:विमान अपघात रोखण्यासाठी पक्षांची दिशा सरकार बदलणार? पण कशी?
जिल्ह्यात वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पण शेतकऱ्यांना अजून ही भरपाई मिळाली नाही. रानटी हत्तींचा उपद्रव वाढला आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यात आला नाही. सुरजागड खाणीतून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे अपघात वाढले आहेत. रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अशा स्थितीत मान्सूनच्या आधी रस्ते बंद करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढवली आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिक फार त्रस्त आहेत, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे आंदोलन केले. या आंदोलनात कार्यकर्त्यांना आपल्या हातात खेळण्यातील हेलिकॉप्टर घेतली होती. मुख्यमंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना गडचिरोलीचे वावडे असेल तर त्यांनी हेलिकॉप्टरने यावे. जिल्ह्यातील गावा गावात, तालुक्यात काय स्थिती आहे याची माहिती घ्यावी असं आवाहन काँग्रेसने या आंदोलनाच्या माध्यमातून केलं. त्या साठी प्रतिकात्मक हेलिकॉप्टरचे वाटप ही यावेळी करण्यात आले. भर चौकात झालेल्या या आंदोलनाची चर्चा मात्र सर्वत्र रंगली होती.