
महाराष्ट्रात अनधिकृत भोंगे बंदचा कायदा लागू राहील. यामध्ये कुणाची दादागिरी चालणार नाही असा टोला भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांना लगावला आहे. त्यांना या बद्दल विचारले असता ते पुढे म्हणाले की महाराष्ट्राचे महायुती सरकार न्यायालयाचा सन्मान करते. ध्वनी प्रदूषण कायदा हा राजीव गांधी सरकार असताना देखील होता. हा कायदा गणपतीला लागू झाला. नवरात्रीला लागू झाला. पण महाराष्ट्रातील एकाही मशिदीत तो लागू नाही. त्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले. ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. आता कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. असं ही सोमय्या यांनी स्पष्ट केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आजपासून भोंगा मुक्त महाराष्ट्राचा अभियानाचा पाठपुरावा चालू केला असल्याचं यावेळी सोमय्या यांनी सांगितलं. मुंबई पोलिस आयुक्तांनी जशी मोहीम राबवली तशी बुलढाणा जिल्ह्यात राबवावी असे आवाहन बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक यांना केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बुलढाणा जिल्ह्यात नायब तहसीलदारांनी जे बेकायदा आदेश दिले आहेत या बाबत मोहीम राबवत असल्याचे किरीट सोमय्यानी सांगितले. सोमय्या सध्या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
दरम्यान मशिदीवरील भोंग्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किरीट सोमय्या यांना फटकारलं होतं. सोमय्यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात मोहीमेत पुढाकार घेतला आहे. त्यात किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो असं अजित पवार म्हणाले होते. तसंच अजित पवारांकडून पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी दादागिरी चालणार नाही असे प्रत्युत्तर अजित पवार यांना दिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world