मनीष रक्षमवार, प्रतिनिधी
Gadchiroli News : आपण गावाची कल्पना करतो तेव्हा नजरेसमोर काय येतं? भरगच्च इमारत, २० किंवा २५ घरे, ग्रामपंचायत, अंगणवाडी, मध्यवर्ती ठिकाणी एखादं देऊळ, रस्त्यावर ये-जा करणारी गुरं-ढोर असे काहीसे चित्र आपल्या मनात असते. परंतू गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात इरपुंडी नावाचे एक गाव आहे. या गावात मागील 40 ते 50 वर्षांपासून फक्त एकच घर असून एकच कुटुंब राहतं. या कुटुंबातील सदस्य हीच या गावची लोकसंख्या आहे. घनदाट जंगलातील एके काळी नक्षली दहशत असलेल्या या इरपुंडीमध्ये झाडे कुटुंबांचे एकमेव घर असून सध्या कुटुंबात ७ सदस्य आहेत.
विशेष म्हणजे २०११ साली झालेल्या शासकीय जनगणनेत इरपुंडीची स्वतंत्र नोंद आहे. इरपुंडीत पाच पुरुष आणि एक महिला असे मिळून ६ लोकं असल्याची नोंद आहे. धानोरा तालुक्यातील २३० गावांत २०२४-२०२५ मध्ये केलेल्या जनगणनेमध्ये इरपुंडीतील लोकसंख्या ९ असल्याचे नोंदवले आहे. हे गाव गडचिरोली शहरापासून ४२ किलोमीटर अंतरावर असून जंगलातून जाणाऱ्या या रस्त्यावर जवळपास अर्धा किलोमीटर इतका कच्चा रस्ता आहे. तेथून पुढे झाडे यांच्या घरी जाण्यासाठी काँक्रिटचा रस्ता करण्यात आला आहे. यशोदा झाडे यांचे वय ६० वर्ष असून त्या कुटुंबाचा प्रमुख असून त्यांच्यासोबत ३ मुले, सून आणि दोन नातवंडे असा परिवार आहे.
नक्की वाचा - Akola News : अकोल्यात 13 वर्षांच्या मुलीनं संपवलं आयुष्य, शाळेतील 'त्या' प्रकरणामुळे उचललं टोकाचं पाऊल!
त्यांचा पतीच्या निधनानंतर कष्टाने संसार चालवल्याचे यशोदा झाडे सांगतात. आम्ही अनेक पिढ्या या इरपुंडीत राहतो. आमचे एकच कुटुंब असले तरी आम्हाला कधीही भीती वाटलेली नाही. लोक आता हत्ती आणि वाघांची भीती असल्याचे बोलतात, पण आमचा कधीही त्यांच्याशी सामना झालेला नाही असं ते सांगतात.