Maharashtra Rain News : पावसाने मार्ग बदलला? मराठवाड्यानंतर 'या' तीन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मराठवाड्यात कहर केल्यानंतर आता पावसाची पाऊलं पुन्हा वळली आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

Maharashtra Heavy Rain : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेकांची शेतीच्या शेती वाहून गेली आहे. ऐरवी स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं आहे. मोडलेला हा प्रपंच उभा कसा करावा याची चिंता लागली आहे. दरम्यान घरांचं नुकसान झालेल्यांना सरकार 5 हजार रुपयांची मदत करणार असून बीडच्या पाहणी दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही घोषणा केली. 

मराठवाड्यात कहर केल्यानंतर आता पावसाची पाऊलं विदर्भाच्या (Vidharbha Rain) दिशेने वळली आहे. हवामान खात्याने २५ सप्टेंबर, गुरुवारी दुपारनंतर विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये विशेषतः यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे. तीनही जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून, विजांचा कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचना पाळाव्यात, सुरक्षित ठिकाणी राहावे तसेच नदी-नाल्यांच्या प्रवाहापासून दूर राहावे, असे आवाहन प्रत्येक जिल्हा प्रशासनाने केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये प्रादेशिक हवामान खात्याच्या वतीने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भ आणि तेलंगणातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 

नक्की वाचा - Lavhe Village : सोलापुरातील 'लव्हे गाव' महापुराचा भीषण चेहरा; हसतं-खेळतं गाव उद्ध्वस्त

    तीन दिवस यल्लो अलर्ट

    भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात आज पासून 3 दिवस म्हणजेच दिनांक २५ ते २७ सप्टेंबर, २०२५ रोजी येलो अलर्ट दिला आहे. या कालावधीमध्ये काही ठिकाणी वादळीवारा, तसेच मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील मोठे पाटबंधारे प्रकल्प जसे तोतलाडोह व नवेगाव खैरी 100% क्षमतेने भरलेले असून वडगाव  आणि नांद धरण हे जवळपास 100 टक्के क्षमतेने भरलेले आहे. तसेच मध्यम स्वरूपाचे धरणे सुद्धा जवळपास 100 टक्के भरलेले आहेत. नदी आणि नाले हे पूर्ण क्षमतेने दुथडी भरून वाहत आहे.

    Advertisement

    काळजी घेण्याचे आवाहन 

    1. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीजगर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. 

    2. पाऊस व विज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. तसेच नदी, नाले, दुथळी वाहत असतात तेव्हा पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असते, अशा वेळी चुकूनही तो पुल किंवा रस्ता चालत किंवा गाडी मधून ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. 

    Advertisement

    3 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूरच्या वतीने खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    काही महत्वाचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत :

    जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर

    संपर्क क्र. ०७१२-२५६२६६८

    नागपूर महानगरपालिका, नागपूर

    नियंत्रण कक्ष संपर्क क्र. ७०३०९७२२०० / ०७१२ - २५६७७७७

    Topics mentioned in this article