सुरज कसबे, प्रतिनिधी
पुण्याचे पर्यटक संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात मृत्यू झाला. निष्पाप संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे हे कुटुंबासह जम्मू काश्मीरमधील निसर्गाचं सौंदर्य पाहण्यास गेले होते. पण, असं काही होईल याची 'जगदाळे' आणि 'गनबोटे' यांना पुसटशी कल्पना नव्हती. त्यांची जम्मू काश्मीरमधील ट्रिप अखेरची ठरली. कुटुंबाच्या समोरच त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात आतापर्यंत 27 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सर्वधर्म समभाव मानणारे संतोष जगदाळे यांनी मित्र सय्यदच्या पश्चात त्याच्या मुलीचं पालकत्व स्वीकारलं होत. सय्यद हे मुस्लीम असताना ही जाती आणि धर्माची भिंत त्यांच्यात कधीच आली नाही. मित्राच्या मुलीची लग्नाची जबाबदारी देखील त्यांनी स्वीकारली. पण तोच धर्म विचारून 'संतोष जगदाळे' यांच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडण्यात आल्या. ज्यात संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला.
नक्की वाचा - NDTV Marathi Manch : नितीन गडकरींनी मांडला Unstoppable महाराष्ट्राचा रोडमॅप, वाचा महत्त्वाचे मुद्दे
संतोष यांच्यासह मुलगी आसावरी, प्रगती असे तिघेजण जगदाळे कुटुंब आणि कौस्तुभ गनबोटे, संगीता गनबोटे हे जम्मू -काश्मीरमधील पहलगाम येथे ट्रिपसाठी गेले होते. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घनदाट झाडी आणि थंड वाऱ्याची झुळूक अंगावर घेत गप्पा मारणाऱ्या दोन्ही कुटुंबावर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी पडली. पाच दहशतवादी अचानक आले आणि तुमचा धर्म कुठलाय असं विचारत थेट एके 47 मधून गोळ्या झाडल्या. काही कळायच्या आत होत्याच नव्हतं झालं. गोळ्यांचा आवाज ऐकून परिसरात गोंधळ उडाला. पर्यटकांनी धावाधाव सुरू केली. पण, निष्ठूर दहशतवाद्यांनी महिला आणि मूल सोडून हिंदू पुरुषांना लक्ष केलं. या घटनेनंतर अवघ्या भारत देशात संतापाची लाट आहे. बदल्याची भावना आहे.
गनबोटे आणि जगदाळे कुटुंबाला पर्यटनाची आवड
पर्यटनाची आवड असलेल्या जगदाळे आणि गणबोटे कुटुंब हे व्यावसायिक दृष्टया आणि आर्थिक दृष्टया सरस होते. पुण्यात दोघांचा ही व्यवसाय आहे. जगदाळे आणि गनबोटे यांची फरसाणची वेगवेगळी कंपनी होती. व्यावसायिक दृष्ट्या एकत्र असलेले हे मित्र पुढे चालून कुटुंबासह वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनासाठी जायचे. जम्मू-काश्मीरची ही त्यांची अखेरची ट्रिप ठरेल असं कुणालाही वाटलं नव्हतं.