Kalyan News : जन्म प्रमाणपत्रातील केवळ एका अक्षराची दुरुस्ती करण्यासाठी 15 दिवस लागणार असल्याचे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (केडीएमसी) सांगितल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. सांगलीहून कल्याणमध्ये आलेल्या एका पालकाला हा अनुभव आल्याने त्यांच्या मुलाच्या कॉलेजमध्ये प्रवेशाबाबत चिंता निर्माण झाली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे केडीएमसी गटनेते उमेश बोरगावकर यांनी महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत, केवळ एका शब्दाच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना एवढा कालावधी वाट पाहावी लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
जन्म प्रमाणपत्रांबाबत अधिक सावध भूमिका...
सोमवारीच अशा प्रकारच्या दुरुस्तीसाठी 15 ते 20 नागरिक त्यांच्या कार्यालयात आले होते. दोन दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन मोठ्या प्रमाणात जन्म प्रमाणपत्रे अवैधरित्या जारी झाल्याचा आरोप केला होता. सुमारे दोन हजार संशयित जन्म प्रमाणपत्रे आढळल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी आणि संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने जन्म प्रमाणपत्रांबाबत अधिक सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत असले तरी, त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याची टीका होत आहे. सांगलीचे रहिवासी प्रदीप वाणी यांच्या मुलाच्या जन्म प्रमाणपत्रात आडनावाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये त्रुटी झाली होती. 'Wani' ऐवजी vani हा शब्द वापरण्यात आल्याने दुरुस्तीसाठी ते कल्याणला आले होते. मात्र, संबंधित दुरुस्तीसाठी 15 दिवस लागतील, अशी माहिती त्यांना महापालिकेकडून देण्यात आली.
नक्की वाचा - Maharashtra Rain : महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन कधी? शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून मोठी माहिती
याबाबत प्रतिक्रिया देताना उमेश बोरगावकर म्हणाले की, "देशातील पहिली ई-गव्हर्नन्स महापालिका म्हणून ओळख असलेल्या केडीएमसीमध्ये जर एका शब्दाच्या दुरुस्तीसाठी 15 दिवस लागत असतील, तर महापालिकेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे." बोरगावकर यांनी या विषयाची माहिती आयुक्तांना दिली असून नागरिकांची गैरसोय थांबवण्यासाठी हा प्रश्न तातडीने सोडवण्याची1 मागणी केली आहे.