यशपाल सोनकांबळे, पुणे:
Ketan Agrawal Mother Letter to PM Modi: पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने अवघा देश हादरुन गेला. केतनला त्याची होणारी पत्नी सिया गोयल अन् तिचा प्रियकर चेतन चौधरीने अत्यंत निर्घृणपणे संपवले. या प्रकरणी सिया आणि चेतन चौधरीला अटक करण्यात आली असून दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. केतनच्या हत्येनंतर अग्रवाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पोटचा गोळा गमावल्याने केतनच्या आईला मोठा धक्का बसला असून याप्रकरणी त्यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहित न्यायाची मागणी केली आहे.
केतनच्या आईचं काळीज पिळवटणारं पत्र..
"माझं नाव राखी अग्रवाल.. मी केतन अग्रवालची आई आहे. मी कधी कल्पनाही केली नव्हती की मला माझ्या स्वतःच्या मुलासाठी न्यायाची मागणी करत तुम्हाला पत्र लिहावं लागेल. प्रत्येक आईप्रमाणे मीही केतनला एक सुंदर आयुष्य घडवताना, लग्न करताना आणि आमच्यासोबत म्हातारं होताना पाहण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण त्याऐवजी मला माझ्या मुलावर अंत्यसंस्कार करावे लागले. एका आईसाठी यापेक्षा जास्त वेदना कोणीच देत नाही," असं केतनच्या आईने पत्रामध्ये म्हटलं आहे.
"माझ्या मुलाची निर्घृणपणे हत्या झाली, आणि त्याच्यासोबतच माझी संपूर्ण दुनिया निघून गेली. आमच्या घराचा प्रत्येक कोपरा मला त्याची आठवण करून देतो. त्याची खोली, त्याचे कपडे, त्याचे फोटो आणि त्याच्या हास्याची जागा घेतलेली शांतता, हे सर्व मला रोज आठवण करून देतात की तो कधीही परत येणार नाही. केतनच्या मृत्यूनंतर अवघ्या वीस दिवसांनी जेव्हा माझ्या सासऱ्यांचे निधन झाले, तेव्हा आमच्या कुटुंबावर आणखी एक हृदयद्रावक आघात झाला. त्यांचं केतनवर खूप प्रेम होतं आणि नातवाला गमावण्याचं दुःख ते सहन करू शकले नाहीत," काही दिवसांतच, आमच्या कुटुंबाने दोन पिढ्या गमावल्याचं दुःखही त्यांनी सांगितले आहे.
लेकाला न्याय देण्याची मागणी
"मोदीजी, मी फक्त एक आई आहे. मी सहानुभूती किंवा कोणत्याही विशेष सवलतीची मागणी करत नाही. मी फक्त न्यायाची मागणी करत आहे. न्यायाशिवाय प्रत्येक दिवस आमचं दुःख अधिकच वाढवत आहे. केतन परत येऊ शकत नाही, पण ज्यांनी त्याचा जीव घेतला त्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे. मला फक्त एवढंच हवंय की माझ्या मुलाला न्याय मिळावा. हात जोडून मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते की, कृपया याची खात्री करा की माझ्या मुलाच्या प्रकरणाकडे योग्य लक्ष दिले जाईल आणि कोणताही विनाकारण विलंब न लावता न्याय मिळेल."
"कृपया केतनला फक्त एक केस फाईल बनू देऊ नका. तो कोणाचा तरी मुलगा होता, कोणाचा तरी नातू होता, कोणाचा तरी भाऊ होता, पण माझ्यासाठी तो माझी संपूर्ण दुनिया होता. प्रत्येक रात्री मी त्याच्या फोटोकडे बघते आणि म्हणते, बाळा, आई अजूनही तुझ्यासाठी लढत आहे. मी फक्त एवढीच प्रार्थना करते की एक दिवस मी त्याला सांगू शकेन, बाळा... तुला न्याय मिळाला. माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही एका शोकाकुल आईचा आवाज... अशी भावनिक मागणी त्यांनी केली आहे.
Mumbai Alert: मुंबईकरांनो सावधान! जुलै महिना धोक्याचा... 'या' तारखा लक्षात ठेवा; BMCकडून मोठा अलर्ट
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world