विष्णू बुर्गे, प्रतिनिधी
Latur Farmer Couple Video: लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी बु. येथील शेतकरी काशिनाथ पुंडलिक गायकवाड यांची संघर्षमय कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी शेतात वीज कोसळून त्यांच्या दोन बैलांपैकी एका बैलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून पावसाळी हंगाम आणि पेरणीचे दिवस सुरू असतानाच त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. नवीन बैल खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नसल्याने काशिनाथ गायकवाड आणि त्यांच्या पत्नीला स्वतःच शेताच्या मशागतीसाठी जुंपावे लागत आहे.
बैलाऐवजी पत्नीला औताला जुपले
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका एका सर्वसामान्य शेतकऱ्याला बसला आहे. बोंबळी बुद्रुक येथील काशिनाथ पुंडलिक गायकवाड यांच्या शेतावर काही दिवसांपूर्वी वीज कोसळली. या दुर्दैवी घटनेत काशिनाथ यांच्या दोन बैलांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. पेरणीच्या तोंडावर आलेले हे संकट काशिनाथ यांच्या कुटुंबासाठी कंबरडे मोडणारे ठरले आहे.
सध्या पावसाळी हंगामाचे दिवस असून शेतीची मशागत वेळेत करणे आवश्यक आहे. मात्र, नवीन बैल विकत घेण्यासाठी लागणारा मोठा निधी या शेतकऱ्याकडे उपलब्ध नाही. अशा हतबल परिस्थितीत, काशिनाथ आणि त्यांच्या पत्नीने स्वतःलाच नांगराला जुंपून शेताची मशागत करण्याचा निर्णय घेतला. माणसाला नांगराला जुंपलेले पाहून आजच्या प्रगत युगातील शेतीचे दाहक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. दरम्यान, या घटनेनंतर तरी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या पीडित कुटुंबाला मदत करणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. जोपर्यंत शेतीमालाला योग्य भाव आणि संकटाच्या काळात ठोस आधार मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या नशिबी असा संघर्षच राहणार आहे, हेच या घटनेने अधोरेखित केले आहे.
Beed Crime : फोन करून सांगितलं'कार्यक्रम ओके'! प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवलं
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world