Maharashtra Rain Alert News: मान्सूनने राज्यभरात दमदार हजेरी लावली असून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई कोकणात पावसाच्या सरी बरसल्याचे पाहायला मिळाले. दरवर्षी जूनमध्ये दाखल होणारा मान्सून यंदा रखडला होता, अखेर आता सर्वत्र पाऊस सक्रिय झाला आहे. अशातच आता हवामान विभागाने महत्त्वाची अपडेट दिली आहे.
पावसाचा जोर वाढणार, २३ जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. २५ जूनपासून राज्याच्या विविध भागांत पावसाच्या सरींनी हजेरी लावली असून, वातावरणात सर्वत्र गारवा पसरला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेष म्हणजे, २६ जून रोजी राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
कोकण पट्ट्यात पावसाचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईसह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, येथील नागरिकांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घाटाच्या प्रदेशांतही पावसाची तीव्रता अधिक असल्याने जनजीवन प्रभावित होऊ शकते.
राज्यात पावसाचे आगमन झाल्याने पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, पेरणीपूर्वी हवामानाचा अंदाज घेणे गरजेचे असल्याचे कृषी तज्ज्ञांनी म्हटले आहे. हवामानातील या बदलामुळे साथरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नक्की वाचा : Ketan Agarwal Murder: सियाचे आई-वडील पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, केतनबाबत झाले हळवे तर लेकीबद्दल म्हणाले...)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world