- महाराष्ट्रातील 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान
- 3 डिसेंबरला होणार होती मतमोजणी
- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतमोजणी 3 डिसेंबरऐवजी 21 डिसेंबरला घेण्याचा दिला आदेश.
राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला म्हणजेच मंगळवारी मतदान होत आहे. 3 डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतमोजणी 21 तारखेला होईल असे आदेश दिले आहेत. 3 तारखेला होणारी मतमोजणी 21 डिसेंबरला घेण्याचा निर्णय न्यायालयाने का दिला, याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणारे सगळे अधिकारी आणि कर्मचारी टेन्शनमध्ये आले आहेत, कारण त्यांना ईव्हीएम मशिन, त्यामधील सगळा डेटा यावर 21 डिसेंबरपर्यंत डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागणार आहे.
नक्की वाचा: नगरपंचायत-नगरपरिषद उद्या होणारी मतमोजणी रद्द
नागपूर खंडपीठाने आपल्या आदेशात नेमके काय म्हटले ?
अपीलावर ठरवून दिलेल्या मुदतीत निर्णय न झाल्याने किंवा यासारख्या कायदेशीर पेचामुळे अंदाजे 24 नगर परिषदा आणि 154 प्रभागातील निवडणुका स्थगित झाल्या होत्या. या ठिकाणी 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. या नगर परिषदा आणि प्रभाग सोडून इतरत्र ठिकाणची मतमोजणी 3 डिसेंबरला झाली असती तर त्या निकालांचा परिणाम 20 तारखेला होणाऱ्या मतदानावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे न्यायालयात धाव घेणाऱ्या याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. यामुळे नागपूर खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आदेश दिला की, पुढील मतदान बाधित होऊ नये, त्यांच्या निकालावर परिणाम पडू नये या उद्देशाने मतमोजणी 21 डिसेंबर रोजी घेण्यात यावी. तोपर्यंत आचारसंहिता लागू असेल असेही न्यायालयाने म्हटले आहे. Exit polls चे निकाल देखील 20 डिसेंबरच्या मतदानानंतर अर्धा तास जाहीर होणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
20 डिसेंबर रोजी कोणत्या नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे ?
अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक होत असलेल्या 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे
ठाणे- अंबरनाथ.
अहिल्यानगर- कोपरगाव,देवळाली,प्रवरा, पाथर्डी व नेवासा
पुणे- बारामती,फुरसुंगी- उरुळी देवाची
सोलापूर- अनगर व मंगळवेढा
सातारा- महाबळेश्वर व फलटण
छत्रपती संभाजीनगर- फुलंब्री
नांदेड- मुखेड व धर्माबाद
लातूर- निलंगा व रेणापूर
हिंगोली- वसमत
अमरावती- अनंजनगाव सूर्जी
अकोला- बाळापूर
यवतमाळ- यवतमाळ
वाशीम- वाशीम
बुलढाणा- देऊळगावराजा
वर्धा- देवळी. चंद्रपूर- घुग्घूस
मतमोजणी लांबल्याने काय होईल ?
मतमोजणी 21 डिसेंबरला घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्याने आचारसंहिताही 20 डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे. ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल. ईव्हीएमसाठी स्ट्राँग रुम, मतमोजणी केंद्र राखीव ठेवावी लागतील. रोज स्ट्राँग रुममध्ये जाऊन अधिकाऱ्यांना पाहणी करावी लागेल. निकालापर्यंत प्रशासन आणि पोलिसांची यंत्रणा कामी लागणार आहे.
नक्की वाचा: भाजप विरुद्ध सेना संघर्ष पेटला! मध्यरात्री निलेश राणेंचा पोलिस स्टेशनमध्ये राडा
मुख्यमंत्र्यांनी पुन्हा व्यक्त केली नाराजी
कोर्टाने दिलेल्या आदेशाबद्दल प्रश्न विचारला असता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, कोर्टाने जर निर्णय दिला असेल तर ते मान्यच करावा लागले. पण कोर्टात गेले काही काळात जी पद्धती वापरली जात आहे ते योग्य वाटत नाही. सिस्टीम फेल्युअरमुळे होणाऱ्या या गोष्टी योग्य नाहीत, यात निवडणूक आयोगाने सुधारणा केली पाहीजे. सगळी मतमोजणी थांबवणे योग्य नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world