
Maharashtra workers working hours : राज्य सरकार कामाचे तास वाढविण्याच्या योजनेवर काम करीत असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कामगार विभागाने याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. अखेर यावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून महाराष्ट्रात दिवसाचे कामाचे तास 9 वरुन 12 तासांवर करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या ease of doing business च्या धोरणाअंतर्गत देशात होणारे बदल लक्षात घेता कायद्यातील हे बदल उद्योग आणि कामगार या दोन्ही घटकांसाठी महत्त्वाचे असून उद्योग क्षेत्राला अधिक लवचिकता आणि कामगारांसाठीही पारदर्शक आणि नियोजित कामकाजासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
नक्की वाचा - मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरकरांसाठी खूशखबर! मंत्रिमंडळ बैठकीत मेट्रो-लोकलसाठी मोठे निर्णय
कारखाने आणि दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात ही वाढ करण्यात आली आहे. कारखाने अधिनियम 1948 च्या कलम 65 मध्ये कारखान्यातील कामगारांच्या दैंनदिन कामाच्या तासांची मर्यादा 9 तास होती. ती आता 12 तासांपर्यंत करण्यात आली आहे. आतापर्यंत कारखान्यातील मधला ब्रेक किंवा विश्रांतीचा कालावधी 5 तासांनंतर 30 मिनिटं इतका होता. तो आता 6 तासांनंतर 30 मिनिटं इतका करण्यात आला आहे.
नव्या नियमांनुसार, दुकानांमध्ये कामाचे तास 9 वरुन 10 करण्यात आले आहेत. तर तातडीचे काम सोपविलेल्या कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ साडेदहावरुन 12 तासांवर करण्यात आला आहे. यातील कलम 56 मध्ये आठवड्याचे कामकाजाचे तास 48 तासांवरून 60 तासांपर्यंत वाढविण्यात आले आहेत.
कलम 65 मध्ये कामगारांच्या अतिरिक्त वेळेबाबत (ओव्हरटाईम) आता कमाल मर्यादा 115 तासांवरून 144 तासांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार आहे. तसेच शासन मान्यतेशिवाय असा वेळेतील बदल कारखान्यांना परस्पर करता येणार नाही. त्याचबरोबर, आठवड्यात 48 तास काम ही कालमर्यादा ओलांडता येणार नसल्याचेही कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी सांगितले आहे. कामगारांकडून जास्तीचे काम घेतल्यास त्याचा पुरेपूर मोबदला आणि पगारी सुट्ट्या देण्यासंबंधीचे बदल यात सुचविण्यात आल्याचं फुंडकर यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world