
देवा राखुंडे, बारामती: बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान पार पडणार आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खुद्द ब वर्ग प्रतिनिधी म्हणून मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पुरस्कृत श्री निळकंठेश्वर पॅनलचे अधिकृत उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये ब वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उमेदवारी घोषित करण्यात आली.
1984 साली इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणूक लढवून अजित पवारांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली होती.त्यानंतर आता पुन्हा एकदा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः उमेदवारी दाखल केली आहे. आज तीन वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून अजित पवार स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
शरद पवार गटाच्या भूमिकेकडे लक्ष
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकी संदर्भात आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री निळकंठेश्वर पॅनलची उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी हा निळकंठेश्वर पॅनल सर्व पक्षीय असल्याचे सांगितले आहे या निवडणुकीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट यांची युती होईल अशी चर्चा होती मात्र या जाहीर झालेल्या यादीमध्ये शरद पवार गटातील उमेदवारांना संधी दिली गेली नाही.
यामुळे आता शरद पवार गटाकडून काय भूमिका घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे शरद पवार गटाने जर ही निवडणूक लढवली तर ही निवडणूक तिरंगी होणार का हे आज दुपारी तीन वाजता स्पष्ट होईल. तत्पुर्वी शरद पवार गटाकडून अजित पवारांना 21 पैकी पवार गटाने 6 जागा मागितल्या असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अजित पवार गटाने त्यांना संधी दिली नसल्याचे दिसत आहे.
(नक्की वाचा- Dharashiv News: छेडछाडीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीची आत्महत्या)
दरम्यान, शरद पवारांची राष्ट्रवादी दादांच्या पॅनल सोबत किंवा भाजपच्या पॅनल सोबत युती करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष असेल. बळीराजा पॅनलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा या निवडणुकीत 55 उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे दादांच्या पॅनल सोबत युती करणे किंवा भाजपचे नेते चंद्रहार तावरे यांच्या पॅनल सोबत युती करणे, असे दोन पर्याय आहेत.
(नक्की वाचा- Political News : महायुतीत दोस्तीत कुस्ती! 2029 विधानसभेसाठी आतापासूनच उमेदवारांची जुळवाजुळव?)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world