- माथेरान घाटातील अरुंद आणि चिखलयुक्त रस्ते पावसाळ्यात वाहतूक दुर्घटनेला कारणीभूत ठरत आहेत
- माथेरान घाटावर एका कारचा अपघात झाला असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे पण कारचे मोठे नुकसान झाले
- माथेरानमध्ये पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी, असे पोलिसांनी सांगितले आहे
मेहबूब जमादार
मान्सूनचे आगमन झाले आहे. अशा वेळी अनेक जण वर्षा पर्यटनाचा बेत करतात. त्यात ही बऱ्याच जणांची पसंती ही माथेरनला असते. इथले उंच डोंगर, हिरगागार निसर्ग, डोंगरातून पडणारे धबधबे, छोटे छोटे झरे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. शिवाय माथेरानला जाण्यासाठी असलेला वाघमोडी घाट म्हणजे पर्यटकांसाठी एक वेगळचं थ्रिल असतं. पण याच गोष्टी आता धोकादायक ठरत आहेत. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. त्यामुळे माथेरान घाटातून प्रवास करत असाल सावधान रहा असं आवाहन करण्यात आलं आहे.
माथेरानच्या घाटात अरुंद रस्ते आहे. शिवाय चिखलामुळे वाहने घसरत असल्याचं ही समोर आलं आहे. पाऊस पडल्यानंतर त्याचे प्रमाण वाढले आहे. विकेंड असता की पर्यटकांची पावलं आपोआप माथेरानकडे वळतात. माथेरानमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या कारला अपघात झाला आहे. हा अपघात माथेरान घाटात झाला आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली आहे. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. कार अक्षरश: रस्ता सोडून खाली घरसली आहे.
माथेरान घाटातील कड्यावरचा गणपती असणाऱ्या परिसरात तिव्र वळणं आहेत. अशाच एका तीव्र वळणावर गाडी वळवत असताना हा अपघात घडला आहे. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये दोन महिला आणि चालक होते. ते नशिनाने थोडक्यात बचावले आहेत. पावसामध्ये माथेरान घाट रस्ता निसटता झाला आहे. पावसामुळे चिखल ही रस्त्यावर येत आहे. त्यामुळे रस्ते हे निसरडे झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर गाडी चालवणे हे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे वाहन चालकांना सावकाश आणि सुरक्षित वाहन चालविण्याचे नेरळ-माथेरान पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळ्यात अनेक पर्यटक हे कर्जत, खोपोली, लोणावळ, खंडाळ्याकडे जातात. पण बहुसंख्य पर्यटकांची पसंती ही माथेरानला असते. मुंबईच्या जवळ असल्याने तिथे पर्यटकांची गर्दी पावसाळ्यात दिसते. तुलनेत स्वस्त आणि मस्त असल्याने ही माथेरानकडे जाणाऱ्यांचा कल अधिक आहे. पण इथली अवघड वळणं, पाऊस अन् चिखलाने अडचण निर्माण होत आहे. अशा वेळी पर्यटकांच्या सुरक्षेचे उपाय या मार्गावर केले पाहीजेत अशी मागणी होताना दिसते. शिवाय विकेंडला या ठिकाणी गर्दीही खूप असते. त्यासाठी ही उपाय झाले पाहीजे असं पर्यटकच सांगत आहेत.