- अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण झाला असून पक्षाच्या भविष्यासंदर्भात विविध चर्चा सुरू आहेत
- मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ही झाले. यावेळी दिग्गज नेते उपस्थित होते. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काय होणार याची चर्चा सुरू झाली होती. त्यानुसार अनेक तर्क ही लावले जात होते. राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार? दोन्ही राष्ट्रवादी एक होणार का? राष्ट्रवादीत फुट पडणार? अशा चर्चा ही रंगल्या होत्या. मात्र त्याच वेळी राष्ट्रवादीचा बडा नेता आणि मंत्री याने मोठी मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची पुढची दिशा काय असेल याचा अंदाज येतो.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावे अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की सगळ्यांची मागणी आहे वहिनींना मंत्रिपदी आणावं. जनतेची ही तिच प्रामाणिक इच्छा आहे. त्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून तसा निर्णय घ्यायला विनंती करू असे ही झिरवाळ यावेळी म्हणाले. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करावं, दादांना ही खरी श्रद्धांजली होईल. शिवाय दादांचा, पवार कुटुंबाचा वारसा चालू राहील असं ही ते यावेळी म्हणाले.
अजित पवारांच्या अकस्मित निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पक्षाचं काय होणार याचीच चर्चा सगळीकडे सुरू होती. अजित पवारांसारखा चेहरा आणि सर्वमान्य ताकदीचा नेता राष्ट्रवादीत सध्या तरी नाही. अशा वेळी नेतृत्व करण्याची स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणार आहे. त्यात आता पवार कुटुंबातीलच कुणी पुढे येणार की अन्य कोणी नेतृत्व करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभा खासदार आहेत. अशात त्या राज्यात परत येणार का हा प्रश्न आहे.
शिवाय अजित पवारांचे दोन मुलं पार्थ आणि जय यांच्याकडे पक्षाची धुरा दिली जाणार का हा ही प्रश्न आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहेत. त्यात आता सुनेत्रा पवार यांच्याकडेच नेतृत्व द्यावे ही मागणी पहिल्यांदा पुढे आली आहे. त्याला आता किती प्रमाणात पाठिंबा मिळतो हे पहावं लागणार आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे या नेत्यांचे म्हणणे काय असणार हे ही महत्वाचे ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world