मान्सूनचं आगमन जवळपास दहा ते बारा दिवस आधी झालं आहे. मुंबई कोकणसह महाराष्ट्रातल्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. ऐन मे महिन्यात पाऊस आल्याने पावसाळ्याच्या जून जुलै महिन्यात पाऊस असेल की नाही अशी शंका आतापासूनच व्यक्त केली जात आहे. हवामान खातं पाऊस येणार असं सांगतं आणि नंतर पाऊस येत नाही असा आतापर्यंतचा अनूभव आहे. त्यामुळे मान्सून यावेळी लवकर दाखल झाला, मग तो आता लवकर जाणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावर तज्ज्ञांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मान्सून लवकर आला तर तो लवकर जाणार का यावर हवमानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. पाऊस म्हणजे नळ नाही की उघडला की पावसाला सुरूवात आणि बंद केला की पाऊस बंद असं होत नाही. पावसासाठी समुद्रात निर्माण होणारी स्थिती आणि भौगोलिक स्थिती या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक असतात असं ते सांगतात. 26 तारखेला मुंबई, पुणे, ठाणे आणि राज्याच्या इतर भागात झालेला पाऊस हा न भूतो न भविष्यती आहे असं ही त्यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणतात मुंबईमध्ये पावसाचे आगमन 15-16 दिवस आधी झालंय. कोकणात पावसाचे आगमन हे वेळेच्या 10 दिवस आधी झालं आहे. वेळेआधी आलेला पाऊस आणि त्याच्या पीछेहाटीचा तसा कोणताही संबंध नाही. असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पावसाचा वेग विविध स्थितींवर अवलंबून असतो. पावसाचा आवेग ओसरला की कदाचित 1-2 दिवस पाऊस पडणारही नाही. असं ही होसाळीकर यांनी स्पष्ट केलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - Maharashtra Rain : नागरिकांनो घरातच थांबा, मुंबईसह 'या' 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट
पण पुन्हा पावसासाठी पोषक स्थिती होईल आणि मग पावसाचा जोर वाढेल असे ही त्यांनी सांगितले आहे. यंदा हवामान खात्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. हा पाऊस संपूर्ण देशात होईल असं ही सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रामध्येही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पावसासाठी स्थिती अत्यंत पोषक असून हवामान खात्यानेच वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाचे आगमन यंदा लवकर झालं आहे.