Maharashtra Rain Monsoon News: जून महिना अर्धा उलटूनही संपूर्ण महाराष्ट्र सध्या भीषण उन्हाचा आणि उकाड्याचा सामना करत आहे. मात्र, पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या राज्यासाठी अखेर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मान्सून पुन्हा एकदा पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाला आहे. २३ जूनच्या आसपास मान्सूनचा प्रवास पुन्हा वेग घेणार असून, तो महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये वेगाने पुढे सरकणार आहे.
महाराष्ट्रात मान्सून कधी कोसळणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २२-२३ जूनपासून दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या लगतच्या भागांत मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर हळूहळू वाढून २४ ते २६ जून दरम्यान तो मुंबईसह उत्तर कोकण आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांपर्यंत पोहोचेल. हवामान अभ्यासक के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी दिवसांत राज्यातील बहुतांश भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा पावसाचा जोर जूनच्या अखेरपर्यंत कायम राहू शकतो.
राज्यात मान्सूनच्या पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पेरण्या खोळंबल्या होत्या, ज्यामुळे बळीराजा चिंतेत होता. मात्र, आता अनुकूल वातावरण निर्मिती झाल्याने दिलासा मिळाला आहे. सध्या अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
येत्या आठवड्यात, साधारणपणे २२-२३ तारखेपासून, दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या लगतच्या भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर हळूहळू वाढून २४ ते २६ जून दरम्यान तो उत्तर कोकण (मुंबईसह) आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांपर्यंत पोहोचू शकतो. हवामान अंदाजाच्या मॉडेल्सनुसार, आगामी दिवसांत राज्यातील बहुतांश भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस जूनच्या अखेरीपर्यंत सुरू राहू शकतो, अशी माहिती के एस होसाळीकर यांनी दिली आहे.
( नक्की वाचा : Sanjay Raut: संजय राऊतांच्या 'ऑपरेशन तुडवा'ला शिंदेच्या शिलेदाराचे आव्हान; सुरक्षेसाठी शिवसैनिक बनणार ढाल )
तर पालघर जिल्ह्याला उष्ण हवामानाचा 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मान्सूनच्या या पुनरागमनामुळे राज्यातील वाढत्या तापमानापासून नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.