Country's first 15-coach local train Mumbai: मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी, विशेषतः पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (ICF) पूर्णतः तयार झालेली देशातील पहिली १५ डब्यांची सलग लोकल १८ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. ही लोकल लवकरच पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार असून, यामुळे विरार-चर्चगेट दरम्यानच्या प्रवाशांना मोठी मदत होणार आहे.
पश्चिम रेल्वेमध्ये 15 डब्यांची लोकल
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या २११ फेऱ्या धावतात, मात्र त्यातील अनेक फेऱ्यांमध्ये डब्यांची जोडणी वेगळ्या पद्धतीची असते. आता आयसीएफने विशेष तंत्रज्ञान वापरून सलग १५ डब्यांची ही गाडी विकसित केली आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या आणखी १२ लोकल आगामी काळात मुंबईत दाखल होणार असल्याचे आयसीएफ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
'स्वीकृत'साठी उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना ठेंगा ? एकही नगरसेवकपद मनसेला न देण्यासाठी हालचाली
गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य
पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन १५ डब्यांच्या गाडीची प्रवासी क्षमता प्रचंड आहे. गर्दीच्या वेळी एकाच वेळी साधारण ७,५५५ प्रवासी या गाडीतून प्रवास करू शकतील, ज्यामुळे वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. सध्या विरार ते अंधेरी दरम्यान धिम्या मार्गावर १५ डब्यांच्या ११२ फेऱ्या चालवल्या जातात. या फेऱ्या अंधेरीच्या पुढे वांद्रेपर्यंत नेण्याचे रेल्वेचे नियोजन आहे.
यासाठी विलेपार्ले, सांताक्रूझ, खार रोड आणि वांद्रे या स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण होताच विरार-वांद्रे धिम्या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल नियमितपणे धावू लागतील, ज्यामुळे उपनगरीय प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल.