Sindhudurg News: NDTVच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग! मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, राजकीय दबाव आणि प्रसारमाध्यमांच्या भूमिकेमुळे हे काम वेळेत सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

 गुरु दळवी, सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो वाहनधारकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महामार्गावर हुमरमळा येथे पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली होती, मात्र आता या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यास सुरुवात झाली आहे. NDTV मराठीने दोन दिवसांपूर्वी या रस्त्यांच्या दुर्दशेचा पोलखोल केला होता, त्यानंतर संबंधित ठेकेदाराने तातडीने कामाला सुरुवात केली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, राजकीय दबाव आणि प्रसारमाध्यमांच्या भूमिकेमुळे हे काम वेळेत सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

हुमरमळा येथील मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था गेल्या काही दिवसांपासून अत्यंत खराब झाली होती. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला होता आणि प्रवासाचा वेळही खूप वाढत होता. यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालक संतप्त झाले होते. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी NDTV मराठीने दोन दिवसांपूर्वी एक विशेष वृत्तांकन करून महामार्गाच्या या दुरवस्थेचा पर्दाफाश केला होता. या वृत्ताचा मोठा परिणाम झाला असून, ठेकेदाराला त्वरित काम सुरू करावे लागले आहे.

Mumbai Goa Highway: तारीख पे तारीख! गणपतीतही मुंबई-गोवा मार्गाचं विघ्न हटेना, आता नवी डेडलाईन

या प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी 15 ऑगस्टपर्यंत खड्डे दुरुस्त करून रस्ता सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिले होते.  त्याचवेळी, माजी आमदार वैभव नाईक यांनी या प्रश्नावरून सरकारवर दबाव वाढवण्यासाठी 13 तारखेला 'चक्काजाम' आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या दोन्ही घडामोडींमुळे प्रशासनावर आणि ठेकेदारावर कामासाठी दबाव वाढत होता. मात्र, NDTV मराठीच्या वृत्तानंतर ठेकेदाराने कोणतीही वेळ न घालवता काम सुरू केले आहे. त्यामुळे हा माध्यमांचा मोठा दणका मानला जात आहे.

सध्या हुमरमळा येथील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. खड्डे बुजवून रस्ता तात्पुरता का होईना, सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यांची अशी दुर्दशा होणे सामान्य असले, तरी महामार्गाच्या कामाचा निकृष्ट दर्जा या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. या घटनेने हेच सिद्ध होते की, माध्यमांनी एखादी गोष्ट लावून धरल्यास प्रशासनाला आणि संबंधित यंत्रणांना त्वरित कारवाई करावी लागते. यामुळे, भविष्यात महामार्गाची कामे अधिक दर्जेदार व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच! स्थानिकांचा रास्तारोको, ठेकेदाराला घेरलं