धाराशिवकर गूढ आवाजाने हादरले! 2 दिवसांपासून नागरिकांमध्ये घबराट, प्रशासनाचे अलर्ट राहण्याचे आवाहन

Dharashiv News: धाराशिव शहर, कळंब, वाशी आणि भूम परिसरातील नागरिक गेल्या दोन दिवसांपासून एका वेगळ्याच दहशतीखाली आहेत. या भागात सातत्याने प्रचंड मोठे गूढ आवाज ऐकू येत

जाहिरात
Read Time: 2 mins

ओंकार कुलकर्णी, धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ऐकू येत असलेल्या गूढ आवाजांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आवाजांची तीव्रता इतकी होती की घराघरातील भांडी आणि खिडक्या-दरवाजे हादरले, मात्र प्रशासनाने भूकंपाची शक्यता फेटाळून लावली आहे.

धाराशिव शहर, कळंब, वाशी आणि भूम परिसरातील नागरिक गेल्या दोन दिवसांपासून एका वेगळ्याच दहशतीखाली आहेत. या भागात सातत्याने प्रचंड मोठे गूढ आवाज ऐकू येत असून, यामुळे घरातील वस्तू हादरत असल्याचा अनुभव नागरिक सांगत आहेत. यापूर्वीही असे आवाज आले होते, मात्र यावेळी त्यांची तीव्रता अधिक असल्याने चिंतेत भर पडली आहे.

भूकंपाची नोंद नाही

या आवाजांनंतर परिसरात भूकंपाचा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी स्पष्ट केले आहे की, लातूर किंवा लगतच्या कोणत्याही भूकंप मापन केंद्रावर भूकंपाची अधिकृत नोंद झालेली नाही. प्रशासनाने 'नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी' (NCS) कडून या घटनेची पडताळणी केली असता, भूकंपाचा कोणताही प्रकार घडला नसल्याचे समोर आले आहे.

(नक्की वाचा-  Railway Block: गोरेगाव-सीएसएमटी सेवा 3 महिने बंद राहणार, मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे होणार 'मेगा'हाल)

आवाजाचे कारण काय?

प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार, हे आवाज भूगर्भातील नैसर्गिक बदलांमुळे किंवा जमिनीच्या थरांमधील हालचालींमुळे असण्याची शक्यता आहे. अनेकदा जमिनीखालील पोकळीत बदल झाल्यास किंवा वायूच्या हालचालींमुळे असे आवाज येतात, ज्याला शास्त्रीय भाषेत 'सबटेरेनियन साऊंड्स'  म्हटले जाते.

Advertisement

(नक्की वाचा-  Ajit Pawar on ZP Election: "शब्द पाळणे ही माझी ओळख...", मतदानापूर्वी अजित पवारांची मतदारांना अखेरची साद)

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

जिल्हा प्रशासनाने जनतेला धीर देत म्हटलं की, हे आवाज नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असू शकतात, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांना बळी पडू नका. केवळ अधिकृत सरकारी सूचनांचे पालन करा. जर आवाजांची तीव्रता वाढली किंवा घराला तडे गेल्याचे दिसल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाला कळवा. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या अहवालानुसार भूकंप झालेला नाही, तरीही नागरिकांनी सतर्क राहावे," असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Topics mentioned in this article