Nagpur News: मोबाईल दिला नाही म्हणून रागाच्या भरात 13 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नागपुरमध्ये घडली आहे. दिव्या सुरेश कौठारे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. नागपुरच्या खापरखेडा येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे एका १३ वर्षीय शाळकरी मुलीने केवळ मोबाईल न मिळाल्याच्या रागातून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चनकापूर येथील हनुमान मंदिराजवळील झोपडपट्टी परिसरात ही घटना घडली. आठव्या वर्गात शिकणाऱ्या दिव्या सुरेश कौठारे (वय १३) हिने घरात कोणी नसताना नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
मृत दिव्याला मोबाईलवर गेम खेळण्याची तीव्र आवड होती. मात्र, अभ्यास आणि इतर कारणांमुळे तिच्या पालकांनी तिला वारंवार मोबाईल देण्यास नकार दिला होता. मोबाईल न मिळाल्याने दिव्या काही दिवसांपासून नाराज आणि तणावग्रस्त होती. अशातच शुक्रवारी दुपारी घरात कोणी नसताना दिव्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
तिची आई आणि बहीण घरी परतल्यानंतर त्यांना दिव्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खापरखेडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे.
Virar News: आधी VIDEO कॉल, नंतर उचलले टोकाचे पाऊल.. विरारमधील हृदयद्रावक घटना
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world