Nagpur News: नागपूर येथील एका सिव्हिल इंजिनीअरची पत्नी आपल्या पतीच्या सुटकेसाठी कित्येक प्रयत्न करताना दिसतेय. कोणत्याही प्रयत्नांना यश येताना दिसत नसल्याने अखेर तिने सरकारची मदत घेण्याचा निर्णय घेतला. या महिलेचा पती मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पश्चिम आफ्रिकी देश माली येथील तुरुंगात बंदिस्त आहे. उत्तर प्रदेशातील एका कंपनीशी संबंधित आर्थिक वादाच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. तुरुंगात असलेले इंजिनीअर नितिन गुल्हाने (Nitin Gulhane) यांच्या पत्नी प्रियंका गुल्हाने (Priyanka Gulhane) यांनी 'पीटीआय-व्हिडीओ'शी बोलताना सांगितले की, माली येथील न्यायालयाने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्येच त्यांच्या पतीला जामीन मंजूर केला होता. पण संबंधित कंपनीने आश्वासन देऊनही 3.25 कोटी रुपयांची जामीन रक्कम भरली नाही, त्यामुळे नितिन आजही तिथल्या तुरुंगात अडकून पडले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची मागणी
प्रियंका यांनी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपल्या पतीच्या तत्काळ सुटकेसाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, त्यांचे पती मधुमेह आणि उच्च रक्तचाप (हाय बीपी) यासारख्या अनेक आजारांनी ग्रस्त आहेत.
(नक्की वाचा: Nagpur News: 11 वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, Video ही काढला, 12 वीच्या विद्यार्थ्यांचं कृत्य)
काय आहे प्रकरण?
प्रियंका यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पती नोएडा येथील 'आर एस एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड' (AEEPL) मध्ये उपमहाव्यवस्थापक (DGM) पदावर कार्यरत होते. कंपनीने त्यांना एका ग्रामीण विद्युतीकरण प्रकल्पाच्या अंमलबजावणी आणि पर्यवेक्षणासाठी मालीमध्ये नियुक्त केले होते. हा प्रकल्प एका आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक निविदेद्वारे (Tender) मिळाला होता.
(नक्की वाचा: 'ड्रेस कोड' ते 'एन्ट्री टाईम'; CBSE बोर्डाच्या परीक्षेला जाण्यापूर्वी पाहा शेवटच्या मिनिटाचे महत्त्वाचे नियम)
जामीन मिळूनही सुटका का नाही?
मालीच्या न्यायालयाने 15 ऑगस्ट 2025 रोजी 20 कोटी सीएफए फ्रँक (सुमारे 3.25 कोटी रुपये) इतक्या रकमेवर सुटकेचे आदेश दिले होते. पण 5 महिने उलटूनही संबंधित कंपनी किंवा त्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांनी (MD) जामीन रक्कम जमा करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. महिलेने पत्रात असेही म्हटले आहे की, 11 सप्टेंबर रोजी परराष्ट्र मंत्रालयातील विशेष कार्य अधिकारी (OSD) संजीव कुमार यांच्या उपस्थितीत कंपनीच्या एमडींसोबत बैठकही झाली होती. तरीही हे प्रकरण प्रलंबित असून आतापर्यंत कोणताही सकारात्मक निकाल समोर आलेला नाही. प्रियंका गुल्हाने यांनी 'पीटीआय'ला सांगितले की, एवढी मोठी रक्कम स्वतः उभी करणे त्यांच्यासाठी अशक्य आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या प्रकरणात लक्ष घालून मदत करण्याची विनंती केलीय.
(Content Source PTI)