
नवी मुंबई: नवी मुंबईतील सिडको मुख्यालयात बुधवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. उरण तालुक्यातील धुतुम गावातील वयोवृद्ध शेतकरी दत्तू भिवा ठाकूर (वय 83 वर्षे) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. पीडित शेतकऱ्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून होत असलेल्या सततच्या त्रासामुळे मानसिक तणावात येऊन त्यांनी हे पाऊल उचलले. सुदैवाने, उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना वाचवले आणि तातडीने बेलापूर येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शेतकऱ्याची व्यथा: मोबदला नाही, उपजीविकेसाठी वाहनतळ
दत्तू ठाकूर यांच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांकडे चार एकर नऊ गुंठा जमीन आहे. ही जमीन सिडको प्रकल्पात गेल्यानंतरही अद्याप त्यांना मोबदला मिळालेला नाही. उदरनिर्वाहासाठी त्यांनी एक वाहनतळ सुरू केले होते, मात्र सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून त्यावर कारवाई करण्यात आली. यामुळे ठाकूर कुटुंब आर्थिक व मानसिक संकटात सापडले होते. दरम्यान, या प्रकरणावर सिडको प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया राटंबे यांनी सांगितले की,
"श्री. दत्तू ठाकूर यांना 12.5 टक्के पुनर्वसन भूखंड योजनेअंतर्गत दि. 8 नोव्हेंबर 2023 रोजी विशेष सोडतीद्वारे भूखंडासाठी पात्र ठरवण्यात आले होते. त्यांना इरादापत्र प्रदान करण्यात आले असून, आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले. मात्र त्यांनी आजतागायत ती कागदपत्रे सादर केलेली नाहीत."
(नक्की वाचा- Thackeray vs Shinde : 'कम ऑन किल मी' ठाकरे आणि शिंदेंचा मेळाव्यात गाजला नानाचा डायलॉग, नेमकं काय घडलं?)
त्याचबरोबर सिडकोच्या म्हणण्यानुसार, ठाकूर यांनी अवैध बांधकाम केल्याने ते निष्कासित करण्यात आले होते. सिडको प्रशासनाच्या दाव्यानुसार, या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही अन्याय झालेला नाही. या घटनेनंतर स्थानिक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी सिडकोच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, वयोवृद्ध शेतकऱ्यांना वारंवार सिडकोच्या कार्यालयात चकरा मारायला लावणे ही अमानुष वागणूक असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही कार्यकर्त्यांनी सिडकोतर्फे अधिक संवेदनशीलता दाखवावी, अशी मागणी केली आहे.
( नक्की वाचा : Eknath Shinde : राक्षसाचा जीव पोपटात, तसा यांचा जीव BMC.... एकनाथ शिंदेंनी फुंकलं निवडणुकांचं रणशिंग )
या घटनेनंतर अनेक मूलभूत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आपली जमीन प्रकल्पासाठी दिली, त्यांना मोबदला किंवा पर्यायी भूखंड मिळण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागत आहे. कधी कागदपत्रांची अडचण, कधी प्रशासनाची दिरंगाई – या साऱ्याचा बळी होत आहे तो शेवटच्या टप्प्यातील गरीब माणूस. 83 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे सिडकोच्या भूमी प्रकल्पांमधील प्रक्रियात्मक पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सिडकोच्या स्पष्टीकरणानंतरही अनेक अनुत्तरित बाबी शिल्लक आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून योग्य न्याय दिला गेला पाहिजे, अशी मागणी नामदेव भगत माझी संचालक CIDCO यांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world